पंचतत्त्वात्मक पिंडरचना - पृथ्वी तत्त्व
पृथ्वी तत्त्व सर्वात पहिले तत्त्व आहे. या तत्त्वाचे साधक भक्तिमार्गी असतात आणि एखाद्या बुवा, महाराजाला किंवा जडदेही गुरुला मानतात. हे लोक विशुद्ध तत्त्व समजू शकत नाहीत. एक वैदिक परंपरा सोडल्यास इतर पंथांची आणि परंपरांची मजल या तत्त्वापर्यंतच आहे म्हणून त्यांच्यात एखाद्या प्रेषितालाच किंवा श्रद्धेला प्राधान्य आहे. एवढेच नाही, तर त्यांच्यात जडदेहाला सर्वस्व मानलेले आहे, म्हणून मृत्यूनंतर जडदेह नष्ट न करता सुरक्षित ठेवण्याची प्रथा आहे. यातूनच त्यांच्यामध्ये मृतदेहाच्या पूजेची पद्धत (कबर, पीर, कफन आदी) रुढ झालेली आहे. हे तत्त्वदर्शन नसून ही प्रेतपूजा आहे. अशा प्रकारच्या प्रेतपूजेने साधकाला पृथ्वीतत्त्वापुढील कोणत्याही तत्त्वाचे दर्शन होणार नाही. वैदिक परंपरेमध्ये व्यक्तिपूजा नाही म्हणून हजारो धर्मात्मे झाले, पण कोण्याही एकाच्या नावाने धर्माची संस्थापना झालेली नाही. ज्ञानावर कोणाचाही एकाधिकार नाही. ज्ञान सर्वदेशिक आणि सनातन सत्य आहे. साधनेद्वारे साधक ते चिरंतन सत्य मिळवू शकतो एवढेच. परंतु, थोडेसे ज्ञान मिळवून स्वत:च्या नावाने धर्माची स्थापना करणे, हे वैदिक परंपरेत त्याज्य मानलेले आहे. भारतातसुद्धा अशा प्रकारचे अवैदिक प्रयत्न झाले आहेत. वास्तविक भारतात गौतम बुद्ध हे वैदिकच होते. परंतु, त्यांच्यानंतर नवीन बुद्ध धर्म स्थापिला गेला. ख्रिश्चन व इस्लाम धर्मसुद्धा त्याच मार्गाने स्थापिले गेले.
पृथ्वी तत्त्वाच्या साधकाचे शरीर
पृथ्वी तत्त्वाचे साधक स्थूल शरीराचे व बेढब अवयवांचे असतात. त्यांना जडवस्तूंबद्दल प्रेम किंवा श्रद्धा असते. खाणे, पिणे आणि मौज करणे हे त्यांचे ध्येय असते व त्याला मान्यता मिळविण्याकरिता धर्माचा किंवा अध्यात्माचा ते आश्रय घेतात. ते केव्हाही जडाचा त्याग करू शकत नाहीत. ईश्वराकडेसुद्धा ते जडवस्तूची, जसे कामिनी, कांचन व कीर्ती यांची मागणी करतात. ते यासाठीच प्रार्थना किंवा साधना करतात. अशा साधकांना गीतेत ’अर्थार्थी’ म्हटले आहे. याकरिता पृथ्वीतत्त्वाच्या पुजार्यांनी एखाद्या प्रेषिताची, साधूची व महात्म्याची कास धरुन त्याची सेवा करणेच इष्ट आहे. असे ‘अर्थार्थी’ केव्हाही पृथ्वी तत्त्वाचा त्याग करुन उच्चतत्त्वाप्रत जाऊ शकत नाहीत. पृथ्वी तत्त्वावधानी साधकाने जपमाळ घेऊन जप केल्यास त्याला पृथ्वी तत्त्वापलीकडील आप तत्त्वाची झलक दिसू शकेल. आप तत्त्वाचा वर्ण शुभ्र आहे, हे आपण पाहिलेच आहे. म्हणून ख्रिस्तधर्मी पाद्री, नन्स आणि इस्लामी मुल्ला व मौलवी शुभ्र कपडे वापरतात. त्यांच्या पूजास्थानांचा रंगही शुभ्र असतो. त्यांच्या काही देवदेवता, उदाहरणार्थ, देवदूत, परी इत्यादी शुभ्र पंखाच्या कल्पिलेल्या आहेत. ही वैदिक आप तत्त्वाची स्मरणिका आहे.
‘सुफी’ शुभ्र वर्णाच्या संप्रदायात शुभ्र वस्त्राला फार महत्त्व आहे. ते शुभ्र वस्त्र वापरतात, म्हणूनच त्यांच्या पंथाला ‘सुफी’ हे नाव आहे. ‘सूफ’ हा ‘शुभ्र’ शब्दाचा अपभ्रंश आहे. शुभ्र संप्रदाय म्हणजे पृथ्वी तत्त्वाच्या पलीकडे जाऊन उच्च आप तत्त्वाची अनुभूती घेणारा ‘शुभ्री’ म्हणजे ‘सुफी’ संप्रदाय होय. आपण पाहिलेच आहे की, आप तत्त्वाची अनुभूती शुभ्र असते. येशूच्या पित्याचे नाव होते योसफ. योसफला इस्लामी ’युसूफ’ म्हणतात. ‘युसूफ’ शब्द संस्कृतातील ‘य: शुभ्र:’चा भ्रष्ट उच्चार आहे. जो शुभ्र आप तत्त्व जाणतो, तो ‘य: शुभ्रः’ म्हणजेच ‘युसूफ’ किंवा ‘योसफ’ होय. याचा अर्थ असा की, येशू हा असा एक साधक होता की, ज्याने पृथ्वी तत्त्व पार करुन आप तत्त्वात प्रवेश केला होता. परंतु हे सत्य आहे की, या सर्व धर्मांची मर्यादा पृथ्वी तत्त्वापर्यंतच राहिली. कारण, त्यांच्यात पृथ्वी तत्त्वाच्या पलीकडील तत्त्वाचा अनुभव कोणीही मिळविलेला नाही. पृथ्वी तत्त्वाचा गुण-गंध आहे. गंध म्हणजे विश्वसृजनाची व्यक्तिनिष्ठ धारणाशक्ती होय. पृथ्वी तत्त्वाच्या व्यक्ती फारच भडक रंग पसंत करतात. मंद सुवास आणि मंद रंग हे उच्च तत्त्वाचे निदर्शक आहेत.
आप तत्त्वाच्या साधकांच्या शरीरातून दिव्य सुगंध येतो म्हणून त्यांना ’गंधर्व’ म्हणतात. भूतप्रेत, पिशाच्च आणि अधिकतर बाबा, बुवा, महाराज आदी जडदेही यांना मानणारे पृथ्वी तत्त्वाचे साधक असतात. त्यांचा स्वभाव जडासक्त असतो आणि तीव्र वस्तूंची त्यांना विशेष आवड असते. असे लोक जडाची इच्छा करतात आणि जड लाभ मिळविण्याकरिता उत्सुक असतात. या तत्त्वाच्या साधकांना प्रेतदर्शन किंवा अधिकतर ऐतिहासिक जड शरीरांचे दर्शन होते. म्हणजे जे महात्मे कधी काळी इतिहासकाळात प्रत्यक्ष अस्तित्वात होते. उदाहरणार्थ, बुद्ध, येशू, मोहम्मद, आद्य शंकराचार्य, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे त्यांना दर्शन होते. परंतु, या महात्म्यांचे दर्शनसुद्धा सहजासहजी होत नाही. त्याकरिता प्रखर भक्ती आणि श्रद्धा यांची आवश्यकता आहे. जपजाप्य करूनसुद्धा पृथ्वी तत्त्वाचे जडदर्शन होऊ शकते. पृथ्वी तत्त्वाच्या पलीकडील तत्त्वाच्या ज्या देवता आहेत आणि ज्या प्रत्यक्ष जन्म घेत नाहीत, असे मानलेले आहे, त्यांचे दर्शन त्यांना कधीही घडणार नाही. आप तत्त्व देवता शिव, तेजस तत्त्व देवता गणेश, दुर्गा आणि आकाश तत्त्व देवता राम, कृष्ण यांचे दर्शन पृथ्वी तत्त्वामध्ये होत नाही. खर्या बुद्धिवान साधकाने हे समजून घ्यावे की, उच्च तत्त्वाच्या देवतांची दर्शने मनाच्या दृढसंकल्पानेच होत असतात.
आप तत्त्व
पृथ्वी तत्त्वाच्या पलीकडे आप तत्त्व असून ते शुभ्र आहे, हे आपण पाहिलेले आहे. आप तत्त्वामध्ये प्रवेश करण्यापूर्वी साधकाची ‘कुंडलिनी’ जागृत होणे आवश्यक आहे. सर्पदर्शनातून ‘कुंडलिनी’ जागृतीचा अनुभव येतो. ज्या देशात सर्प नाहीत, त्या देशात सरड्याच्या दर्शनाने ‘कुंडलिनी’ जागृतीचा अनुभव येऊ शकतो. परंतु, काही संप्रदायाचे लोक सरड्याला मारण्यात धन्यता मानतात, यात त्यांची चूक आहे. याचा अर्थ असा आहे की, हे लोक पृथ्वी तत्त्व सोडून आप तत्त्वात प्रवेश करु इच्छित नाहीत. हिंदू परंपरेत सर्पपूजन असल्यामुळे सर्पदर्शन हे आप तत्त्वाचा परिचय करुन देणारे आहे.
विलक्षण घबराट आणि शरीरदाह ही ‘कुंडलिनी’ जागृतीची लक्षणे आहेत. साधकाचे हे कर्तव्य आहे की, त्याने स्वत:चा शरीरदाह शांत करुन घ्यावा. याचकरिता पुराणात भगवान शंकर दाहरुप हलाहल प्राशन करतात, असे दाखविले आहे. हलाहल दुसरे-तिसरे काही नसून ‘कुंडलिनी’ जागृतीच्या वेळी साधकाच्या शरीराचा जो विलक्षण दाह होतो, तेच हलाहल आहे. हलाहल सर्वप्रथम समुद्रमंथनातून निघाले. साधना म्हणजेच साधकाच्या शरीराचे समुद्रमंथन असून हलाहल म्हणजे शरीरदाह आहे. या दाहाला शांत करण्याकरिता भगवान शिवाच्या गळ्यात सर्प दाखविला आहे. सर्पदर्शन म्हणजे कुंडलिनी जागृतीचे लक्षण आहे. (क्रमशः)
योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)