सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आसले सुपुत्र जवान सोमनाथ मांढरे यांना लडाखमध्ये वीरमरण आले आहे. लडाख येथे शनिवारी पहाटेपासून त्यांची नेमणूक होती. यावेळी हवामानातील बदलामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवायला लागला. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना त्वरित नजीकच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मांढरे यांचे निधन झाले. त्यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर आज आसले (ता. वाई) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे आसले गावातून लष्कराच्या वाहनातून अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली. मार्गामार्गावर रांगोळ्यांचा सडा घालण्यात आला होता. यावेळी 'अमर रहे अमर रहे सोमनाथ मांढरे अमर रहे, भारत माता की जय,' अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहचली. दरम्यान, पालकमंत्री पाटील, आमदार पाटील, अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांनी मांढरे यांच्या कुटुंबियांचे सात्वन केले.
जवान सोमनाथ मांढरे यांच्या पश्चात्त त्यांची पत्नी आणि आठ वर्षाचा मुलगा व फक्त दहा महिन्याची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यावेळी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, माजी आमदार मदन भोसले, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील, वाई पंचायत समितीच्या सभापती संगिता चव्हाण यांनी जवान सोमनाथ मांढरे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.