हजारो पर्यटकांचा हिरमोड तर स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम
शहापुर: निसर्ग सौंदर्याने नटलेला आणि ठाणे जिल्ह्यातील एकमेव दुर्गम तालुका म्हणुन शहापुर तालुक्याचा उल्लेख केला जातो. चारही बाजुंनी जंगलांनी व्यापलेला निसर्गरम्य असा हा परिसर आहे. तानसा, भातसा आणि वैतरणा अशी तीन मोठी धरणे आणि शेकडो लहान-मोठे धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षन ठरत असतात. त्यामुळे मुंबईपासुन केवळ ८०किमी वर एकदिवसीय पर्यटनासाठी मुंबईकर नेहमीच शहापुर तालुक्याला प्राधान्य देतात.परंतु नुकताच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड प्रादुर्भाव पाहता ठाणे जिल्ह्यातील अनेक धबधब्यांवर पर्यटकांच्या सुरक्षतेच्या कारणामुळे प्रतिबंधात्मक आदेश दिल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
दरवर्षी हजारो पर्यटक पावसाळी सहलीच्या निमित्ताने शहापुर तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देत असतात. मुंबईकरांचा आवडता विकेंड स्पाँट असलेला माहुली,चोंढे,जांभे धबधबा अशा लहान मोठ्या धबधब्यांवर नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. यातील सुप्रसिध्द असलेल्या माहुली किल्ल्यावरील माहुली धबधब्यावर अनेक पर्यटक गर्दी करतात. परंतु मागील वर्षापासुन कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याकारणाने आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावसाळा सुरु होताच शहापुर तालुक्यातील संवेदनशील अशा पर्यटक स्थळांवर सुरक्षिततेच्या कारणाने प्रतिबंधात्मक आदेश देवुन प्रवेश बंदी केली आहे. यामुळे केवळ निसर्ग सौंदर्य पाहायला येणाऱ्या अनेक पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.
स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम
शहापुर तालुका ठाणे जिल्हातील अतिदुर्गम तालुका म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे या तालुक्यात असलेल्या विविध पर्यटन स्थळावर पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होत असल्याने स्थानिक नागरिकांना रानभाज्या, रानकंद यांची विक्री, चहाची टपरी, छोटी हॉटेल याच्या माध्यमातून रोजगार मिळत होता. पण गेल्या वर्षभरापासुन ही पर्यटन स्थळ बंद असल्यामुळे स्थानिकांचा हा रोजगार हिरावला गेला आहे.