राजकारण्यांना भीती दाखवायला लागले तर लोकशाहीच संपुष्टात येईल - जयंत पाटील
27-Jun-2021
Total Views | 187
नांदेड : राजकारणात उद्या नरेंद्र मोदीसाहेब किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एखादा अधिकारी आरोप करु शकतो त्यामुळे हे राजकीयदृष्टया अत्यंत चुकीचे आहे. राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.आज नांदेड येथे पत्रकार परिषदेत अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
'NIA' ने मनसुख हिरेन यांच्या हत्येच्यादृष्टीने मेन टार्गेट ठेवले पाहिजे. परंतु त्याऐवजी अटक झालेल्या व्यक्तीकडून काही वदवून घेऊन त्यादृष्टीने सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा हा नवा प्रकार देशात भाजपने सुरू केलेला दिसतो असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.परमवीरसिंग यांना आयुक्त पदावरून हटवल्यानंतर त्यांनी आरोप केला आहे म्हणजे याअगोदर त्यात तुम्ही सहभागी होतात का? असा प्रश्न निर्माण होत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.कुणीतरी 'अ' आणि 'ब' चं नाव घेत असेल आणि त्यावर कारवाई होत असेल तर ही अत्यंत चुकीची पध्दत आहे. असंच घाबरवण्याचं काम केंद्रसरकारच्या एजन्सी करत असतील तर लोकशाहीला सुरुंग लावण्याचं काम सुरू झालं आहे असं गंभीर विधानही जयंत पाटील यांनी यावेळी केले.