मुंबई : सध्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. या आठवड्यात जवळपास १५ जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. या १५ जिल्ह्यांमधून सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, मुंबईत सावध पवित्रा म्हणून अजूनही तिसर्या टप्प्यातील निर्बंध मुंबईसाठी लावण्यात आले आहेत. मुंबईचा ‘पॉझिटिव्हिटी रेट’ हा कमी होत असला तरी जोपर्यंत मुंबई पहिल्या टप्प्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईची लोकलसेवा सुरू केली जाणार नसल्याचे संकेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. मुंबईकरांची काळजी असल्याकारणाने अद्याप लोकल सेवा सुरू करता येणार नाही, असेही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागरिकांनी प्रशासनाला साथ देऊन प्रशासनाने केलेले नियम व अटी योग्यरीत्या पाळले, तर राज्यातील ‘पॉझिटिव्हिटी रेट’ हा अजूनही कमी होत जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध हळूहळू पूर्णपणे उठवता येतील, असेही यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसेच धारावीच्या जनतेचे अभिनंदन विजय वडेट्टीवार यांनी केले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचे तंतोतंत पालन धारावीच्या जनतेने केले असल्यामुळेच धारावीमधील कोरोना जाण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती उदयनराजे हे एकत्र आले याचा आम्हाला आनंद आहे. मात्र, त्यांनी ओबीसी समाजासाठीही एकत्र यावे, अशी आमची विनंती असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच ते सर्वांचे राजे आहेत. त्यामुळे आपण राज्याच्या विरोधात मोर्चे काढून उपयोग नाही, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. तो देशभर लागू होणार आहे. त्यामुळे ओबीसींची जनगणना व्हायला हवी. ओबीसींची जनगणना राज्याने करावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही यावेळी विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.