पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीत तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाले आणि त्यानंतर राज्यात हिंसेचे थैमान सुरू झाले. राज्यात अशी स्थिती असतानाही ममता बॅनर्जी यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. बंगालमधील ‘ममतामयी’ हिंसाचाराची भीषण परिस्थिती दैनिक मुंबई तरुण भारत समोर आणत आहे. आजच्या सातवया मतमोजणी अधिकारी अवि दास यांची आई मोनिका दास यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केल्याची घटना जाणून घेऊ.
नवी दिल्ली, पार्थ कपोले : “मी मतमोजणीच्या कर्तव्यावर असताना मिदनापूर भागातील माझ्या घरावर तृणमूल काँग्रेसच्या गुडांनी बॉम्बहल्ला केला, त्यामध्ये माझे घर उध्वस्त झालेच. मात्र, त्या गुडांनी माझ्या आईलाही जबर मारहाण केली. त्या धक्क्यातून माझी आई अद्यापही सावरलेली नाही”. मतमोजणी अधिकारी अवि दास आणि त्यांची आई मोनिका दास यांनी राष्ट्रीय महिला आयोगास आपल्यावरील हल्ल्याची माहिती देताना नमूद केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेल्या हिंसाचाराची झळ केवळ भाजप अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांनाच बसलेली नाही. त्यामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या विविध अधिकाऱ्यांनाही बसली आहे. यावरून प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा हिंसाचार किती नियोजनबद्ध होता, हेच दिसून येते.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प. बंगालमधील अशा अनेक घटनांची सविस्तर दखल घेतली आहे. मतमोजणी अधिकारी अवि दास आणि त्यांच्या आईने तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याची माहिती आयोगाने घेतली आहे. अवि दास म्हणाले, “मी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होती, २ मे रोजी मी माझ्या मतमोजणी अधिकाऱ्याच्या कर्तव्यावर होतो. माझ्या घरी माझी आई एकटीच होती. मतमोजणीच्या दिवशी दुपारीच तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी माझ्या घरावर बॉम्ब हल्ला केला. त्यामध्ये माझ्या घराची मागच्या बाजुची भिंत पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे गुंड तेवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी माझ्या वृद्ध आईलादेखील जबर मारहाण केली. माझ्या आईला मारहाण करताना गुंड माझे नेमके ठिकाण विचारत होते, कारण त्यांना खरे तर मलाच लक्ष्य करायचे होते. त्यामुळे २ तारखेपासून मी माझ्या घरी जाऊ शकलेलो नाही, माझ्या आईची भेट घेणेही मला ६ मे रोजी महिला आयोगाच्या पथकामुळे शक्य झाले आहे”.
आयोगाने यावेळी मोनिक दास यांचाही जबाब नोंदवून घेतली. आयोगाने त्यांची भेट घेतली असता त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही, कारण २ मे नंतर ६ मे रोजीच त्यांची त्यांच्या मुलाशी म्हणजे अवि दास यांच्याशी भेट झाली होती. तोपर्यंत आपला मुलगा जिवंत आहे की नाही, याची खात्री त्यांना नव्हती. मोनिका दास यांनी गुंडांनी घरावर केलेला बॉम्ब हल्ला आणि मारहाण याविषयी आयोगासमोर जबानी दिली. दास यांना २ मे च्या हल्ल्यानंतरही सातत्याने धमक्या येत होत्या, त्यांच्या गावातील अनेक लोकांनी निर्दोष नागरिकांच्या हत्या करणाऱ्या, त्यांना मारहाण करणाऱ्या गुंडांना पाठिंबा देत असल्याची गंभीर बाबही मोनिका दास यांनी आयोगाच्या निर्दशनास आणून दिली. सध्या अवि दास आणि मोनिका दास यांनी अन्य सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. कारण तृणमूल काँग्रेसचे गुंड आपल्यावर पुन्हा हल्ला करतील आणि आपला बळी घेतील, अशी भिती अद्यापही त्यांच्या मनात आहे.