नवी दिल्ली : आज पंतप्रधान नेरंद्र मोदींनी देशातील ५४ जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. पण या बैठकीनंतर एक नवा राजकीय वाद सुरु झाला.केंद्र सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात हा वाद सुरु झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीनंतर ‘केंद्राकडे ना कोणतं धोरण, ना कोणती उपाययोजना, असं असूनही बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही’, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला. ममतांच्या या आरोपाला आता केंद्र सरकारनं प्रत्युत्तर दिले आहे. ममता यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिलं नाही, असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चांगल्या कामांची माहिती मिळवण्यासाठी काही राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची वागणूक अत्यंत अशोभनीय होती. त्यांनी संपूर्ण बैठकीला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरोप केला की फक्त भाजपशासित राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावले जात आहे. पण, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत आंध्र प्रदेश, केरळ, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनीही आपले मत मांडले आहे. ममता बॅनर्जी यांनी २४ परगनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिलं नाही. त्या म्हणाल्या की जिल्हाधिकाऱ्यांना काय माहिती, त्यांच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे”, अशा शब्दात रविशंकर प्रसाद यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांच्या संवादाचा हा दुसरा टप्पा होता. देशातल्या एकूण १०० जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान संवाद साधणार होते. त्यापैकी ४६ जिल्हाधिकारी १८ मे रोजी तर आज ५४ जिल्हाधिकारी सहभागी झाले. महाराष्ट्रासह, उत्तरप्रदेश, हरियाणा, केरळ, बंगाल या १० राज्यांतल्या ५४ जिल्हाधिकाऱ्यांसोबत हा संवाद होता. मात्र ," या बैठकीला दहा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते, त्यामुळे मी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीला उपस्थित राहू दिलं नाही. मात्र भाजपचे मुख्यमंत्री सोडता इतर मुख्यमंत्र्यांना बोलूच दिलं नाही”. भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ चूपचाप बसून होते. कोणीही काहीही बोललं नाही. आम्हाला व्हॅक्सीन अर्थात लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिलं नाही, असा आरोप ममता बॅनर्जींनी केला.