मुंबई : "अनिल देशमुख ही मोघलाई नाही. याठिकाणी मोघली कायदे चालत नाहीत. इकडे तुमचे राज्य नसून संविधानाचे राज्य चालते. तुम्ही कितीही धमक्या दिल्यात तरी मी मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा वकील जयश्री पाटील यांनी घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी बहुचर्चित परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणावर सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला.
या राज्यात तुमची ताकद चालत नाही, तर संविधानाची ताकद चालते. ही मोगलाई नव्हे. अनिल देशमुख हे सामान्य नागरिक आणि उद्योजकांना धमकावून भ्रष्टाचार करु शकत नाहीत, अशी टीका वकील जयश्री पाटील यांनी केली.डायरेक्टर जनरल सीबीआय हे चौकशी करतील, आणि मला बोलावलं जावं असं कोर्टाने म्हटलं आहे. फक्त माझीच याचिका कोर्टाने ऐकली. कोर्टाने माझं खूप कौतुक केलं, कोणीतरी एक शूर आहे, जे समोर आले आहेत. एवढ्या मोठ्या १००कोटीच्या प्रकरणात कोणी एक तरी शूर आहे जे समोर आले आहेत, असे कोर्टाने सांगितल्याची माहिती जयश्री पाटील यांनी दिली. त्या पुढे असंही म्हणाल्या,"मला हे सांगायचं आहे, अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असाल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय.आज मी खूप खुश आहे. उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. १५ दिवसात अहवाल द्यायचा आहे. मला हे सांगायचं आहे, अनिल देशमुख तुम्ही गृहमंत्री असलात, तुमच्या अंडर महाराष्ट्र पोलीस आहे, त्यामुळे तुम्ही ही चौकशी योग्य प्रकारे करु शकत नाही. त्यामुळे कोर्टाने सीबीआयकडे प्राथमिक चौकशी दिली आहे. यामध्ये मलाही बोलावण्यास सांगितलं आहे."