'केंद्र सरकारविरोधी अफवा पसरविणाऱ्या नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करा'
मुंबई : रेमडीसीवर इंजेक्शनवरून केंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या व खोटी माहिती देऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने रेमडेसिवर उत्पादक कंपन्यांनी महाराष्ट्राला रेमडेसिवर इंजेक्शन देऊ नये अन्यथा आपला परवाना रद्द करू अशी धमकी दिली असल्याची खोटी माहिती देऊन केंद्र व राज्य सरकारमध्ये नाहक वाद निर्माण करून राष्ट्रीय एकतेला तडा जाईल असे वक्तव्य केले, इतकेच नव्हे तर प्रसार माध्यम व समाज माध्यमातून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम केले.
यामुळे भयभीत होऊन हजारो लोक महाराष्ट्र सोडून जाण्यास सुरुवात झाली, रेल्वे स्टेशन, बस स्थानक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. यातून मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाल्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे हे कृत्य पूर्णपणे बेकायदेशीर असून महामारी रोग अधिनियम, १८९७ नुसार गुन्हा असल्यामुळे नवाब यांच्यावर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. राज्य सरकारने पुढील ४८ तासांत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न केल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा आ.अतुल भातखळकर यांनी दिला आहे.