मुंबई : राज्यात वाढती कोरोनास्थिती आणि रुग्णसंख्येच्या प्रमाणात कमी संख्येत उपलब्ध रेमडेसिवीर इंजेक्शन यावर उपाय म्हणून दमन येथील एका फार्मा कंपनीने महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी तयारी दर्शवली होती आणि त्याच कंपनीच्या प्रमुखांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने मुंबईतून अटक केली आहे. दरम्यान, याच कंपनीला केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची परवानगी दिली आहे, ज्याचा पाठपुरावा महाराष्ट्र प्रदेश भाजपने केला होता. मात्र, ज्या ब्रुक फार्मा कंपनीने हा साठा पाठवला त्याच कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना शनिवारी रात्री संशयास्पद म्हणत अटक करण्यात आली.
महाराष्ट्रापासून कोसोदूर दिल्लीत बसून टिवटिव करणाऱ्या साकेत गोखले या राहुल गांधींच्या निकटवर्तीयाने मात्र, ट्विटरवर याविरोधात अपप्रचार सुरू केला आहे. राजेश डोकानियाला यांनी रीतसर राज्याचे अन्न आणि औषध मंत्री राजेंद्र शिंगणे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन औषधांच्या पुरवठ्याबद्दल माहिती दिली होती. मात्र, तरीही त्यांना ताब्यात घेतल्यानंतर साकेत गोखले याने अपप्रचार सुरूच ठेवला आहे. यापूर्वीही राम मंदिर भूमिपूजनाविरोधात उच्च न्यायालयात त्याने याचिका दाखल केली होती. तेव्हा तो चर्चेत आला होता.
साकेत गोखले आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, "शनिवारी रात्री विलेपार्ले पोलीस ठाण्यात मुंबई पोलीसांनी ४.७५ कोटी रुपयांचा रेमडेसिविर औषधांचा साठा जप्त केला. जो गुजरातच्या एका कंपनीकडून आणला जात होता. अचानक विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी यासाठी पाठपुरावा केला असल्याचे म्हटले. फडणवीसांनी हा साठा राज्यात वाटणार असल्याचाही दावा केला.", असा आरोप त्याने केला आहे.
यापूर्वीही विरोधी पक्ष व भाजपने केंद्राकडून रितसर पाठपुरावा केल्याचा पुरावा वारंवार दाखवूनही अशाप्रकारे संभ्रम पसरवण्याचे काम साकेत गोखले सारखी मंडळी करत आहेत. त्याला राज्यातील सत्तेतील राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते हवा देत राजकारण करत आहेत. या प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही गोखले सांगतो.
सोबतच त्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. फडणवीसांसारखी एखादी व्यक्ती (जे राज्याची विरोधी पक्ष नेते आहेत.) गुजरातकडून अशाप्रकारे साठा कसा मिळवू शकतात. फडणवीसांनी राज्य सरकारला याबद्दल कळवले का नाही. राज्यात तुटवडा असताना ४.७५ कोटींचा साठा हा भाजप कार्यालयात नेऊन वाटला जाणार होता का, असे बाळबोध प्रश्न साकेत विचारत आहे. पुढे नवाब मलिक यांची री ओढत तो पुढे म्हणतो, "मलिक यांनी शनिवारी म्हटले होते की, केंद्र सरकारने राज्याचा रेमडेसिविरचा साठा थांबवला आहे. मग राज्याला न कळवता फडणवीसांनी इतका मोठा साठा आणला कसा, असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
राज्यातील कोरोनाची एकंदर परिस्थिती आणि औषधांची कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश भाजपने दमन येथील फार्मा कंपनीला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी विनंती केली होती. भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देत संबंधित कंपनीने राज्याला पुरवठा करण्याची हमी दिली होती. मात्र राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने या बाबतीत कसलाही सहभाग नोंदवला नाही.
संशयाच्या आधारे अटक
उलटपक्षी संबंधित कंपनीवर दबाव टाकण्याचे काम सरकारने केले अशी चर्चा माध्यमांत होती. फार्मा कंपनीच्या प्रमुखांना झालेल्या या "संशयास्पद" अटकेमुळे त्या चर्चेला आता कुठे तरी दुजोरा मिळतोय. या संशयास्पद अटकेनंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पोलिस स्टेशन गाठूण सदरील प्रकरणाबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता केवळ संशयाच्या आधारे त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.