दिल्ली - परमवीर सिंह यांच्या 'लेटर बाॅम्ब'चे पडसाद आज लोकसभेतही उमटले. यावेळी या प्रकरणावरुन शिवसेना आणि भाजपा खासदार एकमेकांशी भिडले. यावेळी भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली.
लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील परमवीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लिहलेल्या पत्रावर चर्चा झाले. या चर्चेवेळी शिवसेना आणि भाजप खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भाजप खासदार गिरीश बापट, पूनम महाजन आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना आमदारांनी त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप खासदारांनी आवेशपूर्ण हे प्रकरण सभागृहासमोर मांडले.
यावेळी बोलताना गिरीश बापट यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. खासदार पूनम महाजन यांनी अनिल देशमुख वसूल करत असलेल्या खंडणीचे वार्षिक गणित मांडले. जर मुंबईच्या एका एसपीला देशमुख हे महिन्याचे १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्यास सांगत असतील, तर त्याची वार्षिक वसुलीची किंमत किती होते ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी खासदार नवनीत कौर यांनीही राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.