तेजस्विनी, येसूवहिनी, जिच्याबद्दल खुद्द ‘स्वातंत्र्यवीर माझे वहिनी माझे स्फूर्ती’ असे आदरपूर्ण गौरवोद्गार रचतात, त्या वीरांगनेचा धैर्यशाली इतिहास ‘मृत्युंजय’ प्रकाशनातर्फे ‘तू धैर्याची अससी मूर्ति’ या साधार चरित्राच्या स्वरूपात प्रकाशित होत आहे. सदर पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक व अध्यासन केंद्र, कर्वे रस्ता, पुणे येथे संध्याकाळी ६.३० वाजता संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकावरील हा परिचयपर लेख...
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकर कुटुंबाचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (तात्याराव), गणेश दामोदर सावरकर (बाबाराव) आणि डॉ. नारायण दामोदर सावरकर (बाळ) या सावरकर बंधूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आयुष्याचं मोल दिलं. त्यांचं कर्तृत्व, ध्येयनिष्ठा, स्वातंत्र्यकार्य, त्याग, बलिदान हे सारंच श्रेष्ठ आहे, वादातीत असीम आहे, अमर आहे. हे तीनही क्रांतिसूर्य जरी तेजाने तळपत असले तरी, ‘पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती, सर्वभावे पती ध्यानी मनी’ या उक्तीला सर्वार्थाने सार्थ करणार्या आणि आपल्या पतींनी (सावरकर बंधूंनी) चेतवलेल्या यज्ञकुंडात झोकून देऊन पतीविरह, हालअपेष्टा, उपासमार सहन करत आपल्या ध्येयापासून काकंणभरही न ढळणार्या सावरकर कुटुंबातील तीन धीरोदात्त स्त्रिया, यशोदाबाई गणेश सावरकर (येसूवहिनी), यमुनाबाई विनायक सावरकर (माई) आणि शांताबाई नारायण सावरकर (ताई) त्यांच्यामागे कायमच खंबीरपणे उभ्या होत्या. अशा या वीरांगनांची शौर्यगाथा गेल्या दीड वर्षांपासून ‘त्या तिघी.. स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री नाटकाच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.
या नाटकाची संकल्पना मनात रुजल्यापासून नाटकाच्या सादरीकरणाचा प्रवास करत असताना क्षणोक्षणी या विषयाची व्याप्ती, तिचा आवाका, त्या तिघींचे स्त्रीपण, श्रेष्ठत्व याबद्दल आदर, उत्सुकता, आपलेपणा वृद्धिंगत होत राहिला. महापुरुषांच्या सहवासात राहणं आणि त्यांचं पत्नीपद भूषवणं महाकठीण याची प्रचिती क्षणाक्षणाला येत राहिली.तिन्ही जावांमधील सगळ्यात ज्येष्ठ म्हणजे यशोदा गणेश सावरकर. सावरकर बंधूंच्या जडणघडणीची, क्रांतिकार्याची खर्या अर्थाने अगदी प्रथमपासूनची, सगळ्यात जवळची साक्षीदार, त्या तिघांचाही खंबीर आधार असणारी म्हणजे येसूवहिनी. त्या तिघींचा अभ्यास करताना येसूवहिनींचे अनेक पैलू, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये समोर येत गेली. त्यांच्यातील धैर्य, त्याग, संयम, प्रेमळपणा, कर्तव्यकठोरता, परिस्थिती ओळखून राखलेले प्रसंगावधान या गुणांचा परिचय वाढत गेला. तीनही बंधूंच्या क्रांतिकार्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे येसूवहिनींनी खस्ता खाऊन सर्वतोपरी साहाय्य केलं. आपला पती आणि दीर अंदमानात अतोनात हालअपेष्टांमध्ये जन्मठेप भोगत असताना, ज्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र ठेवण्यासही बंदी होती, त्या काळात या थोर पुरुषाच्या बालपणीच्या आठवणी, येसूवहिनींनी वत्सल भावनेने, अतिशय बिकट परिस्थितीत अत्यंत धाडसाने लिहून ठेवल्या. ज्या येसूवहिनींनी प्रसंगी पाणी पिऊन दिवस काढले, घरावर येणार्या नित्य झडत्या आणि जप्त्यांना धैर्याने तोंड दिले आणि आपले पतीविरहाचे दुःख बाजूला सारून इतर क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना धीर दिला, त्यांचा सांभाळ केला आणि अखेर पतीदर्शनच्या ध्यासातच त्यांचे देहावसान झाले. अशा वीरांगनेबद्दलची माहिती इतिहासात मात्र अत्यंत विखुरलेली आणि काहीशी दुर्लक्षित आढळली. येसूवहिनींसारख्या तेजस्विनीचा इतिहास, त्यांच्याविषयीची उपलब्ध माहिती, साहित्य, ऐतिहासिक दस्तावेज एकाच पुस्तकात समाविष्ट असावे, या भावनेतून येसूवहिनींचे साधार चरित्र लिहिण्याचे मनाने घेतले आणि येसूवहिनींवर आधारित ‘तू धैर्याची अससी मूर्ति’ हे साधार चरित्र ‘मृत्युंजय प्रकाशना’तर्फे प्रकाशित करताना आणि तुम्हा सर्वांसमोर ठेवताना अतिशय कृतकृत्य वाटत आहे. येसूवहिनींचा संपूर्ण जीवनपट, त्यांच्याविषयीची माहिती, त्यांच्याविषयीचे उपलब्ध साहित्य या साधार चरित्रात समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या संशोधनात्मक चरित्रात येसूवहिनींच्या हस्ताक्षरातील ऐतिहासिक नोंदवही, त्यांच्या माहेरच्या (त्र्यंबकेश्वर) वास्तूची क्षणचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.
येसूवहिनींच्या कर्तृत्वाला अनेक पैलू आहेत. लग्नानंतर त्यांनी सावरकरांचे घर तर सावरलेच, पण सावरकर बंधूंच्या क्रांतिकार्यातदेखील प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. बाबाराव आणि तात्याराव यांनी सुचवल्याप्रमाणे क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना एकत्रित करून, क्रांतिकार्यात स्त्रियांचा सहभाग वाढावा म्हणून इसवी सन १९०५मध्ये येसूवहिनींनी ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ स्थापन केला. ज्या काळात स्त्रिया घराचा उंबरा ओलांडून कारणास्तवच बाहेर पडत असत, त्या काळात येसूवहिनींनी आपल्या धाडसाने आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाने ‘युवती संघ’ चालवला आणि वाढवला. त्या काळातही ‘युवती समाजा’ची सभासद संख्या १००-१५० होती. स्त्रियांमध्ये क्रांतिकार्याचं तत्त्वज्ञान रुजवणं, त्यांच्या मनात देशभक्तीची आस जागवणं, स्वदेशीच्या वापराबद्दल जागरूकता निर्माण करणं, हे या ‘युवती संघा’चं कार्य त्यांनी अतिशय निष्ठेने आणि धाडसाने केलं. या आत्मनिष्ठ ‘युवती संघा’ची कार्यपद्धती आणि रूपरेषा या साधार चरित्रात नमूद केली आहे. ती खालीलप्रमाणे: येसूवहिनी फारच हुशार, चौकस, कडक व करड्या वृत्तीच्या होत्या. बाबा, तात्यांनी येसूवहिनींना व त्यांच्या आप्तेष्ट व मैत्रिणींना एकत्र करून त्यांची एक क्रांतिकारकांना साहाय्य करण्याच्या हेतूने व स्वातंत्र्याच्या आणि स्वदेशीच्या चळवळीचे महत्त्व स्त्रियांमध्ये पसरविण्यासाठी स्त्रियांची एक संस्था स्थापण्यास प्रवृत्त केले. त्याप्रमाणे येसूवहिनींनी ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ ही संस्था १९०५मध्ये वर्तक वाड्यात स्थापन केली. तरुण, वृद्ध, प्रौढ अशा सर्व स्तरातील स्त्रिया या संस्थेच्या सभासद होत्या. तात्या येसूवहिनींना त्यांनी रचलेल्या देशभक्तीपर कवितांचा अर्थ सांगत व त्या कविता वरील संस्थेच्या जमणार्या साप्ताहिक बैठकीत म्हणण्यास सांगत. ही साप्ताहिक बैठक दर शुक्रवारी भरत असे. ‘आत्मनिष्ठ युवती समाजा’ची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे होती.
सर्वप्रथम मित्रमेळ्यातील आबा दरेकर यांचं काव्य किंवा तात्यांनी केलेलं एखादं देशभक्तीपर पद्य एक दोघींनी सांगायचं व इतर जमलेल्या भगिनींनी सामुदायिक म्हणायचं. नंतर ज्यांनी शिवरायांच्या प्रतिमेला हात लावून शपथ घेतली असेल, त्यांनी त्या नवीन उपस्थित असतील त्यांना शिवरायांच्या प्रतिमेला हात लावा म्हणून सांगून आपण प्रतिदणीत म्हणून त्या नवीन भगिनीला शपथ द्यायची. नंतर मग एकमेकींनी हातात हात घ्यायचा, शिवरायांना आणि सिंहवाहना दुर्गादेवीला वाकून, त्रिवार वंदन करून, आपल्या जागेवर परत येऊन बसायचं. उभ्या उभ्या वंदन कधीच करायचं नाही. मानबिंदूच्या पुढे नम्रच राहायला पाहिजे. शपथदान झाल्यावर फुले हळदी-कुंकू वाहून पाठ न दाखवता जागेवर येऊन बसायचे. जर चुकून पाठ दाखवली गेली, तर पुन्हा संस्थेच्या पुढील वारी त्या भगिनीचा शपथविधी होत असे. शपथ पुढीलप्रमाणे होती- “मी शिवरायांना व भवानी दुर्गादेवीला साक्ष ठेवून सांगते की, मी स्वदेशी मालच वापरेन, स्वदेशावर प्राणापलीकडे प्रेम करेन. प्राणपणाने स्वातंत्र्याकरिता झटेन. हे व्रत म्हणून मी पालन करेन व आजन्म स्वदेश स्वातंत्र्याची व्रती म्हणून मी मला म्हणवून घेईन. त्यात मला सर्वश्रेष्ठ समाधान लाभो.”
ही ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ संस्था ‘अभिनव भारत’ या गुप्त संघटनेशी संलग्न होती. क्रांतिकार्यामध्ये भाग घेणार्या मित्रमंडळींच्या कुटुंबातील व अन्य महिलांमध्ये स्वदेशीचा, क्रांतिकार्यात पुरुषांना प्रोत्साहन देण्याचा, प्रचार करण्याचा या संस्थेचा हेतू होता. येसूवहिनी साप्ताहिक बैठकीत देशभक्तीपर गीतांचे गायन करवून घेत. तसेच अशा या बैठकीत देशभक्तीपर आलेले ‘केसरी’तील ब्रिटिशांच्या अन्याय्य राजवटी विरुद्धचे लेख वाचून दाखवित. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा प्रचार ‘केसरी’तून धाडसाने होत असे. त्याचा या संस्थेतील महिलांवर अत्यंत स्फूर्तिदायक परिणाम होई. स्वदेशी व देशभक्ती म्हणजे काय, याचे प्रबोधन केले जाई. बंगालची फाळणी झाली असल्याने महाराष्ट्रातही लोकक्षोभ झाला होता. स्त्रियांमध्ये राजकीय परिस्थितीचे ज्ञान करून देण्यासाठी ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ कार्यरत होता. संस्था वाढावी म्हणून त्या काळात घरकाम सांभाळून येसूवहिनी उन्हाच्या अनवाणी हिंडत. प्रचार प्रभातफेर्या अशा अनेक कामात येसूवहिनी स्वतः भाग घेत असत स्त्रियांना गळ घालत. त्यांना कळकळीने उपदेश देत असत. स्वदेशीचा प्रचार करीत असत. कित्येक स्त्रियांना स्वदेशी पटत नसे. पण, येसूवहिनींचा प्रेमळ आग्रह त्यांना संस्थेत घेऊन येई. अशी ही तेजस्विनी, येसूवहिनी, जिच्याबद्दल खुद्द ‘स्वातंत्र्यवीर माझे वहिनी माझे स्फूर्ती’ असे आदरपूर्ण गौरवोद्गार रचतात, त्या वीरांगनेचा धैर्यशाली इतिहास ‘मृत्युंजय’ प्रकाशनातर्फे ‘तू धैर्याची अससी मूर्ति’ या साधार चरित्राच्या स्वरूपात तुम्हा सर्वांसमोर आणत आहोत. या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झालेली आहे. नोंदणीसाठी या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करू शकता. संपर्क : ९८२२१११४५६
- अपर्णा चोथे