पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा धडाडीने पाठपुरावा करणार्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचा ‘हत्यारा’ या शब्दांत स्पष्ट उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या ‘हकालपट्टीचीच’ मागणी केली. यावरून या विषयाची तीव्रता कशी वाढत गेली, हे स्पष्ट होते.
बंजारा समाजातील धडाडीची तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्याप्रकरणी कारवाईसाठी दबाव वाढल्यानंतरही अद्याप या प्रकरणातील स्वयंसंशयित राजीनामा दिलेले वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे या प्रकरणाचा धडाक्यात पाठपुरावा करणार्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर ‘तक्षकाय स्वाहा’बरोबरच ‘इंद्राय स्वाहा’ म्हणण्याचीही पाळी येणार का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता संजय राठोड यांनी रविवारी वनमंत्रीपदाचा राजीनामा दिला, पण तरी त्यासाठी एवढा विलंब का हा प्रश्न शिल्लक राहतोच.
पूजा चव्हाण हिच्या दुर्दैवी मृत्युबाबत मोठी विचित्र परिस्थिती निर्माण होत आहे. प्रारंभी ‘पूजा प्रकरण’ अशी त्याची चर्चा होत असे. तिने संजय राठोड यांच्या निवडणूक प्रचाराची चालविलेली मोहिम, ‘टिकटॉक क्वीन’ म्हणून तिचे केले जाणारे वर्णन, गगनाला गवसणी घालू इच्छिणार्या तिच्या आशाआकांक्षा, यांचीच चर्चा होत असे. तिच्या कथित आत्महत्येनंतर त्याचे ‘ पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण’ असे नामांतर झाले. मध्येच कुणी तरी तिच्या कथित अपघाती मृत्यूची पुडी सोडली. दरम्यान, अनेक ध्वनिफिती उघड झाल्याने वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले जाऊ लागले आणि आता राठोड अज्ञातवासातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यानंतर ‘पूजा राठोड खून प्रकरण’ या नावाने ते ओळखले जाऊ लागले.
त्यानंतर या प्रकरणाचा धडाडीने पाठपुरावा करणार्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचा ‘हत्यारा’ या शब्दांत स्पष्ट उल्लेख करुन मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या ‘हकालपट्टीचीच’ मागणी केली. यावरून या विषयाची तीव्रता कशी वाढत गेली, हे स्पष्ट होते. खरेतर अशी घटना घडल्यानंतर पोलीस लगेच त्याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करतात आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदवून चौकशी सुरू करतात. त्यासाठी त्यांना कुणाच्या आदेशाची गरज नसते. पण गुरुवारी सकाळी जेव्हा चित्रा वाघ पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात गेल्या तेव्हा त्यांना ‘आमच्याकडे आदेश आले नाहीत’ असे सांगण्यात आले. त्या उत्तरामुळे चित्राताईंनी किती रौद्ररूप धारण केले होते हे संपूर्ण महाराष्ट्राने वृत्तवाहिन्यांवर पाहिले आहे. पण त्यातून पोलिसांनी अप्रत्यक्षपणे एक कबुलीच देऊन टाकली व ती म्हणजे चौकशी न करण्याच्या आदेशाची.
‘आम्ही सांगितल्याशिवाय ‘एफआयआर’ नोंदवायचा नाही व चौकशीही सुरू करायची नाही’ असा वरिष्ठांकडून आदेश आल्याचे जणू वानवडी पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी मान्य करून टाकले. आता १ ते दहा मार्च अशा १० दिवसांच्या काळात महाराष्ट्र विधिमंडळाचे अंदाजपत्रकी अधिवेशन मुंबईत होऊ घातले आहे. कामकाज सल्लागार समितीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे. दरम्यान ‘पोहरादेवी दिग्विजय’ आटोपून संजय राठोड १५ दिवसांच्या अज्ञातवासानंतर नाट्यमय रीतीने प्रकट होऊन मुंबईत पोहोचले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी हजेरी लावली. त्या बैठकीनंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर ‘वर्षा’ बंगल्यात पेशही झाले. या पेशीच्या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व काँग्रेसच्यावतीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत उपस्थित होते.
पण ती पेशी आटोपून ४८ तास उलटल्यानंतरही संजय राठोड यांच्याबाबत कोणताही निर्णय न आल्याने ‘तक्षकाय स्वाहा’, ‘इंद्राय स्वाहा’ असे म्हणण्याची पाळी विरोधी पक्षांवर आली होती. राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशनच चालू देणार नाही, असा इशाराही दरम्यान भाजपने दिला. या गदारोळाच्या काळात रहस्य वाढविणार्या घटना तर इतक्या घडल्या की, त्यामुळे संजय राठोड आरोपांच्या दलदलीत अधिकाधिक फसतच गेले.
पूजाच्या अंत्यविधीनंतर तिच्यासोबत त्या घरी राहणारे दोन्ही तरुण अचानक गायब झाले. त्यांची निवेदने घेण्याचे भानही पोलिसांना राहिले नाही. पोलिसांनी ‘एफआयआर’ तर नोंदविला नाहीच, शिवाय त्या मोहल्ल्यातील लोकांकडेही विचारपूस करण्याची औपचारिकता पूर्ण केली नाही. तिच्या मृत्यूच्या आधी एक दिवस यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या ‘पूजा अरुण राठोड’ या महिलेच्या कथित गर्भपाताबद्दल पोलिसांनी त्या दोन पूजा एकच आहेत की, वेगवेगळ्या आहेत याचीही चौकशी केली नाही. एवढेच नाही, तर ‘ड्युटी’ नसताना त्या कथित गर्भपाताच्या वेळी हजर असलेल्या डॉक्टरचीही चौकशी केली नाही वा तो अचानक गायब का झाला याचीही चिंता केली नाही. आता तर चित्रा वाघ या प्रकाराला हत्याच म्हणत आहेत व संजय राठोड यांचा ‘हत्यारा’ म्हणून उल्लेख करीत आहेत.
वास्तविक आपला काहीच दोष नसेल तर संजय राठोड यांनी १५ दिवसपर्यंत ‘नॉट रिचेबल’ राहण्याचीच गरज नव्हती. त्यानंतरही त्यांना प्रकट व्हायचेच होते तर सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांना त्यांनी भेटायला हवे. पण ज्याअर्थी त्यांनी तो मार्ग निवडला नाही त्याअर्थी मुख्यमंत्री ‘सांभाळून’ घेतीलच याची त्यांना खात्री नसावी किंवा न भेटण्याला मुख्यमंत्र्यांची संमती तरी असावी. म्हणून त्यांनी बंजारा समाज व त्याचे पोहरादेवी येथील धार्मिक पीठ यांच्या साहाय्याने शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला व तो गेल्या मंगळवारी यशस्वीही करून दाखविला. पण आता तोच त्यांच्या अंगलट येण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, हा प्रश्न आता पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्येपुरताच मर्यादित राहिलेला नाही. एकच दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी स्वत: कोरोना महामारीच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन संपूर्ण राज्याला केले असतानाच त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या साक्षीने त्यांच्या निर्देशाचे उल्लंघन होते. हजारो माणसे पोहरादेवी प्रांगणात जमतात. मंत्रीमहोदय त्यांना अभिवादन करतात. स्वागताचा स्वीकार करतात. परंपरागत नगाराही वाजवितात आणि नंतर मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटतात, हा सारा प्रकारच मुख्यमंत्र्यांच्या व त्या रुपाने राज्याच्या प्रतिष्ठेचा बनतो. पण दिसते असे की, मुख्यमंत्र्यांच्या वा राज्याच्या प्रतिष्ठेवर राजकारणाची सोय भारी पडली.
अन्यथा मुख्यमंत्री किमान राठोड यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित राहण्यापासून रोखू शकले असते व त्यांना भेटण्याचे सौजन्यही टाळू शकले असते. खरेतर पोहरादेवीला हजारो माणसे जमविण्याच्या आरोपातून संजय राठोड मुक्त होऊच शकत नाहीत. लोकांना पोहरादेवीला येण्याचे आवाहन महंतांनी केले असले, तरी त्याला राठोड यांची मूकसंमती होतीच. किंबहुना ते आवाहन त्यांच्याच सोयीचे होते. मुख्यमंत्री त्या गर्दीने अस्वस्थ होणे स्वाभाविक असले, तरी ते किंवा सरकार त्याचे दोषारोपण त्यांनी पोलिसांवर करावे हे एक आश्चर्यच आहे.पोहरादेवी येथील ‘इव्हेंट’ संपताना संजय राठोड यांनी पत्रकारांना संबोधित करताना केलेल्या वक्तव्यालाही फारसा अर्थ उरत नाही. आपल्या अज्ञातवासाचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण तर अतिशय लंगडे आहे.
‘पूजाच्या मृत्यूनंतर आपण आपले वृद्ध मातापिता, पत्नी, अन्य कुटुंबीयांना सांभाळण्याचे काम करीत होतो’ असे ते म्हणाले. पण या एका वाक्यातूनच अनेक प्रश्न उपस्थित होतात. एक तर हेच निवेदन पहिल्या दिवशीच करणे त्यांना शक्य होते. मुंबईतील आपल्या बंगल्यातूनच करणे अशक्य नव्हते. त्यासाठी ‘नॉट रिचेबल’ राहण्याची कुठलीही गरज नव्हती. त्यासाठी १५ किंवा ते म्हणतात त्यानुसार दहा दिवसांचा अवधी घेण्याचेही कारण नव्हते. त्या निवेदनासाठी पोहरादेवी हे पवित्र स्थान निवडण्याचीही गरज नव्हती. दुसरी त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी म्हटल्याप्रमाणेच वृद्ध माता-पिता, पत्नी व परिवारातील अन्य सदस्यांना सांभाळण्याचे काम त्यांना करायचे होते, तर त्यातूनही एक प्रश्न निर्माण होतो व त्याची कबुलीही मंत्रीमहोदयांकडूनच मिळते. ती म्हणजे पूजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांची स्थिती स्वत: संजय राठोड यांनी सांभाळण्यासारखी गंभीर झाली होती.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ‘आपण अज्ञातवासात नाही, नॉट रिचेबलही नाही’ असा खुलासा करण्यासाठी त्यांना फार कष्ट पडले नसते. पण त्यांनी तेही केल्याचे दिसत नाही. अशा स्थितीत संजय राठोड खरे बोलत आहेत, हे कसे मानायचे? केवळ पोहरादेवी या श्रद्धेय स्थानावरून बोलले म्हणून? तसे असेल तर तो त्या पवित्र स्थानाचाही अवमानच ठरतो. तरीही पोहरादेवीचा ‘इव्हेंट’ का आयोजित केला गेला, हा प्रश्न उरतोच. त्याची दोन कारणे संभवतात. त्यातील एक शक्यता अशी असू शकते की, पक्षाने म्हणजेच पक्षप्रमुखाने त्यांना या किटाळातून बाहेर पडण्यासाठी सबुरीचा सल्ला दिला असावा आणि त्यातूनच श्रेष्ठींच्या सहमतीने पोहरादेवीच्या ‘इव्हेंट’चा सूत्रपात झाला असावा. दुसरी शक्यता अशीही असू शकते की, घटनेची एकंदर पार्श्वभूमी पाहता मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे सूचित केले असावे.
कारण, पोलिसांनी रीतसर ‘एफआयआर’ दाखल केला नसला, तरी चौकशी सुरूच होती. तिचे अहवाल मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचतच असणार. पोहरादेवीचा नियमभंग झाला नसता, तर मुख्यमंत्र्यांचे राठोड यांना वाचविण्याचे काम सोपे झाले असते. पण आता ते कठीण झाले आहे. पोहरादेवीचा नियमभंग मुख्यमंत्र्यांच्या आणि राठोड यांच्याही गळ्यातली हड्डी बनत आहे. एवढे असूनही मुख्यमंत्री पक्षहितासाठी राठोड यांना वाचवूही शकले असते, पण त्याबाबतीत मित्रपक्ष त्यांच्या प्रारंभापासूनच राठोड यांच्यावर नाराज आहेत. काँग्रेसनेही आपली नाराजी लपवून ठेवली नाही. फक्त ते दोन्ही पक्ष कथित चौकशीच्या आड लपण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मुळात कुणीही संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केलेला नव्हता. त्यांच्या लोकप्रियतेवर वा त्यांनी केलेल्या लोकहिताच्या कामांवर कुणी प्रश्नचिन्ह उभे केले नव्हते. बंजारा समाजाला वा त्याच्या श्रद्धांना कुणी आव्हान दिले नव्हते वा कुणी समाजाची म्हणून बदनामीही केली नव्हती. पूजा चव्हाण किंवा संजय राठोड वा तिचा नातेवाईक अरुण राठोड हे त्या समाजाचे असणे हा केवळ एक योगायोग आहे. त्यामुळे समाजाची बदनामी होण्याचाही प्रश्न उपस्थित होत नाही आणि त्यासाठी होमहवन करण्याची तर गरजच राहत नाही.
- ल. त्र्यं. जोशी