मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी ७ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जो स्फोट झालाय त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादाला महत्व आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्यातील मंत्र्यांनी संचारबंदीचे संकेत दिलेले असताना आज मुख्यमंत्री राज्यातील जनतेशी संवाद साधून कोणत्या मुद्द्यांवर बोलणार, याकडे राज्याचे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांसह मुंबई, पुण्यासारख्या शहरात रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. प्रशासकीय यंत्रणेकडून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधून परिस्थितीतीबाबत माहिती देणार आहे. यावेळी मुख्यमंत्री कोरोनाला रोखण्यासाठी कोणती मोठी घोषणा करतात. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्यभरात कोणती नवी नियमावली जाहीर करतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. शनिवारी महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या सहा हजार २८१ रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील सलग दुसऱ्या दिवशी सहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी सापडलेल्या ६ हजार २८१ रुग्णांपैकी १७०० रुग्णांपेक्षा अधिक किंवा २७ टक्के रुग्ण हे मुंबई आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. राज्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, ९३ हजार ९१३ एवढी झाली आहे. तर ४० जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून ५१ हजार ७५३ झाली आहे. राज्यात सध्या कोरोनाचे ४८ हजार ४३९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जनतेच्या मनात परत टाळेबंदी होतीय का?असे प्रश्न असल्याने उद्धव ठाकरे आजच्या संवादातून उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील.