"पीडितेला न्याय मिळवून देण्याची, या सरकारची तयारी नाही" - केशव उपाध्ये
मुंबई: पुण्यातील २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर संशयाच्या भोवर्यात सापडलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे ११ दिवस उलटल्यानंतरही ‘नॉट रिचेबल’ असल्याने विरोधी पक्षाने यावर कडाडून टीका केली आहे.
“सरकारमधील मंत्री गेल्या ११ दिवसांपासून गायब आहेत. मात्र, याची साधी चौकशीसुद्धा केली जात नाही. यावरून हे लक्षात येते की, पीडितेला न्याय मिळवून देण्याची या सरकारची तयारी नाही. त्यामुळे या सरकारचा निषेध आम्ही करतो,” अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की संजय राठोड हे गुरुवारी आपली भूमिका मांडतील. मात्र, आज त्यांनी काहीही भूमिका स्पष्ट केली नाही. ते माध्यमांसमोर यायला तयार नाहीत. ते ‘नॉट रिचेबल’ आहेत. किमान दररोज मंत्रिमंडळात सोबत असणार्या मंत्र्याचा तरी शोध घ्या. ते कुठे आहेत, याचा खुलासा तरी करा,” असे उपाध्ये यावेळी म्हणाले.