राज्यपालांचे राज्य सरकारला पत्र
मुंबई: नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सध्या हे पद रिक्त आहे. या पदासाठी निवडणूक कधी घेणार, अशा आशयाचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला लिहिले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवरून राज्यपालांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. आता त्याला राज्य सरकार काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पुढील महिन्यात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाअगोदर विधानसभा अध्यक्ष निवडण्यात यावा, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रा संदर्भात कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत काल चर्चा देखील झाली. अध्यक्ष निवडणुकी संदर्भात काय हालचाली करायच्या यावर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची चर्चा झाली.
मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना बारा राज्यपाल नियुक्त आमदारांचे पत्र देण्यात आले आहे. त्या पत्रावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही. असे असताना राज्यपालांनी राज्य सरकारला पत्र पाठवल्याने आता पुन्हा एकदा राज्य सरकार आणि राज्यपाल असा वाद निर्माण होईल असे चित्र दिसत आहे.