मुंबई : बीड येथील तरुणी पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापते आहे. “पूजा चव्हाणबद्दल आवाज उचल्यावर आमच्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन येत आहेत. एखादा कॉल मलाही टाका ना” असं खुलं आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला केले आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याची तक्रार केली आहे."पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवल्यावरून माझ्या सहकाऱ्यांना धमकीचे फोन येत आहे. एखादा फोन मलाही टाका ना..मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे. वाट बघतो आहे !"असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत केले आहे.
“काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते दिशा रवीबद्दल ट्विट करण्यात व्यस्त आहेत, मात्र बीडच्या पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूविषयी एक चकार शब्दही त्यांना काढायचा नाही. त्यांचा मंत्री या प्रकरणात मुख्य संशयित आहे. दुटप्पी भूमिका” असे ट्विट नितेश राणेंनी याआधी केले होते. त्यानंतर राणे यांनी शिवसेनेवर टीका करत आव्हान देणारे ट्विट केले.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी रोखठोक भूमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचे फोन आल्याचा दावा केला जात आहे. याबाबत चित्रा वाघ यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली होती. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेऊन थेट आरोप केले आहेत. वाघ यांनी थेट सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांसमोर येऊन संजय राठोड यांचे नाव घेतले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनाही ट्विट करत "पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे." राज्यातील कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती आरोप केले.