'माय होम इंडिया' संस्थेच्या पुरस्कारांचे मुंबईत वितरण
मुंबई : "ईशान्य पूर्वेतील राज्यांशिवाय संपूर्ण भारताची कल्पना केली जाऊ शकत नाही. जेव्हा पूर्वोत्तर राज्यांना प्रवाहापासून दूर करण्याचा प्रयत्न होत होता, त्यांना भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात होता. तेव्हा त्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि इतर काही संघटनांनी मजबुतीने कार्य केले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या परिस्थितीत भारताच्या पूर्वोत्तर भागातील राज्ये देशाशी एकसंघ ठेवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे," असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले आहे. बुधवार, दि. २९ डिसेंबर रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे 'माय होम इंडिया' संस्थेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सत्कारमूर्ती मेघालयातील प्रसिद्ध लेखक कोशंत सुमेर यांच्यासह सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक राजदत्त, 'माय होम इंडिया' संस्थेचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी, 'माय होम इंडिया'चे व्यवस्थापकीय विश्वस्त श्रवण झा यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुनील देवधर म्हणाले की, "सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय एकनाथ ठाकूर हे मनापासून पूर्वोत्तर राज्यांशी जोडले गेले होते. ज्या ठिकाणी जाण्याची कुणी हिंमत करत नाही अशा भारताच्या पूर्वोत्तर राज्यामध्ये ते 'स्टेट बँक ऑफ इंडिया'च्या शाखांमधील काम पूर्ववत करण्यासाठी तिकडे गेले होते, ही बाब लहान नाही. एकनाथ ठाकूर 'माय होम इंडिया' संस्थेच्या अत्यंत जवळ होते. केवळ माय होम इंडियाच नाही तर देश आणि राज्यातील अनेक सामाजिक संस्थांसाठी एकनाथ ठाकूर यांनी दिलेले योगदान हे अविस्मरणीय आहे."
'लुटिअन्स' दिल्लीतील अनेकांची दुकाने मोदींनी बंद केली
"मागील अनेक वर्षांपासून देशात काही वेगळ्याच व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्याचा पायंडा पाडण्यात आला होता. मात्र, देशात २०१४ साली आलेल्या मोदी सरकारने विविध क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी झोतात न राहता काम करणाऱ्या देशातील अनेक मान्यवरांना 'पद्म पुरस्कार' देऊन सन्मानित करण्याचा नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मात्र 'लुटिअन्स' दिल्लीतील अनेकांची दुकाने मात्र बंद झाली आहेत," अशा शब्दांत देवधर यांनी 'पद्म पुरस्कारा'वरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे.
महाराष्ट्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे राजदत्त यांचे आयुष्य
बुधवारी झालेल्या 'माय होम इंडिया' कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कलाकार - दिग्दर्शक राजदत्त यांनी भूषविले. यावेळी राजदत्त यांच्याविषयी बोलताना देवधर म्हणाले की, "राजदत्त यांचे व्यक्तिमत्त्व हे अत्यंत निरपेक्ष स्वरूपाचे आहे. राजदत्त हे ते संघाचे कार्यकर्ते होते आणि काही वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालवत होते. भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांचे योगदान हे अतुलनीय आहे. राजदत्त यांच्या मोठेपणाला मी सलाम करतो," अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली.
कसाब पकडल्यामुळे 'हिंदू दहशतवादा'चे षड्यंत्र असफल
"दि. २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात हिंदू दहशतवादाचे षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला होता. कसाबच्या हातात मुद्दामहून बांधण्यात आलेल्या त्या एका धाग्यावरून हिंदू दहशतवादाबाबत अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, तपासांती निष्पन्न झालेल्या बाबींमुळे कसाबच्या माध्यमातून विणण्यात येणारे हिंदू दहशतवादाचे षड्यंत्र असफल झाले," असे देवधर यावेळी म्हणाले.
कोशंतजींमुळे हा पुरस्कार सन्मानित झाला
मेघालयचे रहिवासी आणि ज्येष्ठ लेखक कोशंत सुमेर यांना यावेळी 'अवर नॉर्थ इस्ट इंडिया अवॉर्ड' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'स्वधर्म-स्वसंस्कृती आणि स्वभाषेसाठी झगडणारे एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून कोशंत सुमेर महान आहेत. मागील अनेक वर्षांपासून पूर्वोत्तर राज्यांमध्ये धर्मांतरण करण्यासाठी मिशनरी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. कोशंत सुमेर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्यामुळे त्यांचा नव्हे, तर तर पुरस्काराचाच जणू सन्मान झाला आहे," असे सुनील देवधर यांनी म्हटले.
'माय होम इंडिया'चे कार्य सुरूच राहील
"मागील १६ वर्षांपासून देशातील अनेक भागांमध्ये 'माय होम इंडिया' संस्था सक्रियपणे कार्यरत आहे. विशेषतः मुंबईत वास्तव्यास असलेल्या ईशान्य पूर्व राज्यातील मुलांसाठी 'ओएनई' म्हणजेच 'अवर नॉर्थ ईस्ट' ही संस्था अतिशय प्रभावीपणे आपले काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून न्याय किंवा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांकडून संस्थेसाठी कसलीही मदत किंवा अनुदान घेतले जात नाही. 'माय होम इंडिया' संस्था आता १६व्या वर्षात पदार्पण करत आहे. अर्थात, आता ही संस्था तारुण्यात आली आहे. यापुढेही 'माय होम इंडिया'तर्फे करण्यात येणारे कार्य चालूच राहील," असा विश्वास 'माय होम इंडिया' संस्थेचे संस्थापक आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केला.