आजपासून रविवार दि. ५ डिसेंबरपर्यंत गोदाकाठी सारस्वतांचा मेळा भरणार आहे. यानिमित्ताने साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषविण्याचा तिसऱ्यांदा मान नाशिकनगरीला लाभला आहे. त्यानिमित्ताने यापूर्वी नाशिकमध्ये संपन्न झालेल्या १९४२ आणि २००५च्या साहित्य संमेलनाचा धांडोळा घेणारा हा लेख...
नाशिक शहराने मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद पटकावण्याची आता ही तिसरी वेळ. यापूर्वी १९४२ मध्ये आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला साहित्य संमेलनसंपन्न झाले होते. त्यानंतर मात्र नाशिकरांना थेट ६० वर्षे यजमानपदाने हुलकावण्याच दिल्या. मात्र, पुन्हा २००५ मध्ये डॉ. वसंत पवार यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिकने संमेलनाचे यजमानपद मिळवले. आता ही नाशिकच्या यजमानपदाची तिसरी वेळ. या आधी झालेल्या दोन्ही संमेलनांवर नाशिकनेनेटकी व्यवस्था, उत्तम नियोजन, चोखंदळ विषय, भरगच्च आदरातिथ्य आणि त्यापेक्षाही अनेक पटींनी मोठा असा आपलेपणा याच्यावर आपला असा ठसा उमटविला होता, हे विशेष...
महाराष्ट्रात मराठी साहित्य संमेलन म्हटले की, यजमानपदासाठी स्पर्धा असतेच असते. वास्तविक २००५ मध्ये तेव्हा यजमानपद बारामतीला मिळणार होते. परंतु, डॉ. वसंत पवारांनी विनंती केली आणि शरद पवारांनी लगेचच होकार भरला. अर्थात या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद शरद पवारांना सन्मानाने देण्यात आले. साहित्याचे बाळकडू मराठी माणसाला अनादी काळापासून मिळत आले आहे. १९४२ साली नाशिकमध्ये झालेले संमेलन, आचार्य अत्रे यांचे अध्यक्षपद आणि त्याकाळातील मराठी भाषा व साहित्यापुढील आव्हानांचा झालेला ऊहापोह यांनी युक्त होत. २००५ साली झालेले साहित्य संमेलन आजही नाशिककरांना सहज आठवते. कारण, या संमेलनाचे स्थान अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ‘मराठा विद्या प्रसारक मंडळा’च्या प्रांगणात होते. सर्वसामान्य नाशिककरांनी सहज, उत्सुकतेने डोकावून जावं इतकं सोयीस्कर! अर्थात, उत्सवप्रिय नाशिककरांचा या संमेलनाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
साहित्य संमेलनाचे वाद हे नेहमीच अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून सुरू होतात. २००५ साली देखील प्रा. केशव मेश्राम, प्रा. विठ्ठल वाघ, आणि प्रा. रतनलाल सोनाग्रा अशी तीन नावे अध्यश्रपदाच्या शर्यतीत होती. परंतु, स्थानिक नेतृत्वाची चतुराई आणि प्रा. वाघ व प्रा. सोनाग्रा यांच्या मनाचा मोठेपणा यामुळे ही निवडणूक टळली आणि प्रा. केशव मेश्राम बिनविरोध संमेलनाचे अध्यक्ष झाले. वास्तविक साहित्यिकांमधील हेवेदावे, मानपान व अहंकार सांभाळणं अतिशय अवघड काम! परंतु, डॉ. वसंत पवारांनी नाशिककरांच्या वतीने ते सहज पेललं.
या सर्व काळात कार्यवाह म्हणून कविवर्य किशोर पाठकांनी बजावलेली कामगिरीदेखील अतिशय मोलाची आहे. संमेलनाचे साहित्यिक मूल्य राखण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याचवेळी साहित्य क्षेत्रातील नाशिकमधील सर्वच मंडळी मानपान, वैचारिक मतभेद बाजूला ठेवून अथकपणे काम करीत होती. विविध जबाबदाऱ्या वाटून दिल्या गेल्या. विविध समित्यांचे गठन करून, विचारविनिमय करून या प्रचंड मोठ्या कामाला चालना देणे, हेही जिकिरीचे काम होते. वेगवेगळ्या समित्यांच्या कामात समन्वय साधून योग्य त्या वेळेत सर्वच कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान होते. कारण, जवळपास ३५ समित्यांचे यावेळी गठन करण्यात आले. याशिवाय काही उपसमित्यादेखील गरजेनुसार निर्माण केल्या गेल्या. प्रतापदादा सोनवणे, मधुभाऊ झेंडे, विनायक दादा पाटील, भारद्वाज रहाळकर, लक्ष्मण सावजी.... किती नावं घ्यावीत. यातील अनेक जण आज हयात नाहीत. पण, संमेलन यशस्वी करण्यासाठी अक्षरशः सात-आठशेलोक, व्यक्तिगत, सामाजिक, वैचारिक, राजकीय मतभेद बाजूला ठेवून रात्रीचा दिवस करीत,हसतमुखाने राबत होती. नाशिकरांनी तेव्हाच्या संमेलनात दाखवलेल्या बांधिलकीला तोड नाही. संमेलनस्थळी लोककवी वामनदादा कर्डक सभामंडप, कर्मवीर रावसाहेब थोरात सभामंडप, प्रा. वसंत कानेटकर सभामंडप अशी सभास्थानं निर्माण करण्यात आली. सुरेख आसनव्यवस्था आणि श्रवणव्यवस्था केली होती. एकूणच सगळी तयारी उत्तम केली गेली.
संमेलनाची विषयसूचीदेखील चोखंदळपणाची साक्ष देणारी होती. या संमेलनाची विषयसूची पाहिली की, १५ वर्षांनंतरही हेच विषय आजही जीवंत आहेत आणि त्यावर आजही मंथनाची गरज आहे, हे विशेषत्त्वाने लक्षात येते. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, ग्रामगीता, दासबोध, शेतकऱ्याचा आसूड इत्यादी ग्रंथदिंडीत ठेवण्यात आले. पण, जसे संमेलनस्थळी नाशिकच्या क्रांतिपुत्राची आयोजकांना आठवण नव्हती, तशीच ग्रंथदिंडीतही त्यांचे ग्रंथ दिसले नाहीत. यावेळी तरी आयोजक मनाचा मोठेपणा दाखवतील, अशी किमान आशा करूया. संमेलनाचे उद्घाटन अर्थातच शरद पवारांच्या हस्ते झाले. प्रा. केशव मेश्राम यांनी अध्यक्षपदाची सूत्रे आधीच्या अध्यक्षांकडून स्वीकारली.
पहिल्या दिवशीचे मुख्य आकर्षण म्हणजे कवी मंगेश पाडगावकरस यांची प्रकट मुलाखत. पाडगावकरांच्या दिलखुलास आणि बेरकी, पण खुसखुशीत उत्तरांनी लोकांच्या कायमस्वरुपी लक्षात राहिली असेल. तसेच संमेलनात सर्व परिसंवाद नेमके आणि काहीसे एकमेकांना चिमटे काढणारेच होते. पण, तरीही ते वातावरणात प्रसन्नता वाढविणारे झाले. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक वा भाषिक धोरणावर सर्व वक्त्यांनी ‘कुछ मिठा तो कुछ खट्टा’ असा सूर आळवला होता. तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री अशोक चव्हाण तेव्हाही सर्व सूचनांवर विचार करण्याचे आश्वासन एक खट्याळ हसू चेहऱ्यावर वागवत देत होते. आजही हा विषय साहित्य संमेलनाचे विषयसूचीत सामील करण्यासारखी परिस्थिती कायम आहे. त्या संमेलनात ‘रावसाहेब थोरात सभागृहात आजचे स्त्री साहित्य पुरेसे प्रगल्भ नाही’ या विषयावर विद्या बाळ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. काळाच्या ओघात या विषयावरदेखील याही संमेलनात पुन्हा परिसंवाद आवश्यक आहे. कारण,मराठी स्त्री साहित्याच्या प्रगल्भतेत मागील १५ वर्षांत काही भर पडली, असे आढळत नाही.
दुसरा परिसंवाद ‘प्रसारमाध्यमे, वाचन संस्कृती उद्ध्वस्त करीत आहेत’ या विषयावर रंगला. यात वक्ते प्रा. राम कापसे, डॉ. विश्वास मेहेंदळे, श्रीनिवास पाटील आणि वंदना अत्रे, डॉ. लक्ष्मण देशपांडे हे होते. सर्वच वक्ते अतिशय नेटके विचार मांडून गेले. अर्थात प्रसारमाध्यमे आपली वाचन संस्कृती उद्ध्वस्त करीतच आहेत. आज आपण १५ मिनिटे एका जागी स्वस्थ बसणे विसरलो आहोत. वाचनासाठी एके ठिकाणी स्थिर राहणे नव्या पिढीला आज एक आव्हान आहे आणि प्रसारमाध्यमे तथ्यहीन माहिती पुरवून आजच्या तरूणांना अधिक संस्कारहीन व विघटनवादी करीत आहेत. वास्तविक वाचनीय, प्रवाही आणि प्रभावी साहित्य निर्माण करणं, हे लेखकाचेच काम आहे.
‘साहित्य समीक्षे’वरही एक परिसंवाद २००५च्या संमेलनात आवर्जून होता. ‘समीक्षा’ हा आजही मराठी साहित्यातील एक भाग आहे. ‘खांडेकर- कुसुमाग्रजांचा लेखकधर्म आज उरलेला नाही’ या विषयावर माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगला. लेखन हे लेखकाचं विशिष्ट परिस्थितीच आकलन व प्रगटीकरण आहे. तेव्हा हा विषय नेहमीच काळाशी सुसंगत असा आहे,त हे सर्वच वक्त्यांनी मांडलं आणि मान्यही केलं. लेखकधर्म म्हणजे काय, या मुळ मुद्द्यापासून कालसुसंगतपर्यंत मोकळ्या वातावरणात पुढील पिढीला दिशादर्शन होईल इतकी चांगली मांडणी या परिसंवादात झाली, हे प्रकर्षाने सांगावसं वाटतं.
याशिवाय ‘नवसमाज निर्मिती आणि मराठी संतांची शिकवण’, ‘मराठी उद्योजकांचे साहित्य : स्वरूप आणि अपेक्षा’, ‘मराठी साहित्यात विनोद दुर्मीळ झाला आहे’, ‘मी आणि माझ्या लेखनाची प्रेरणा’ या विषयांवरील परिसंवादात अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले. निमंत्रितांचे आणि खुले कवी संमेलनही झाले. सरतेशेवटी खुले अधिवेशन व समारोपाने संमेलनाची सांगता झाली. कोणताही अनुचित प्रकार, निदर्शनं, वादावादी, राजीनाराजी न होता संमेलन सुखनैव पार पडले. थोडासा एक दोन ठिकाणी नाराजीचा सूर ऐकू आला, पण तो अगदीच नगण्य!
भाषा, साहित्य, संगीत यांना बसण्यासाठी राजाश्रय लागतच असतो. महाराष्ट्रातील राजकीय व्यक्ती हा पाठिंबा देण्यासाठी नेहमीच पुढे असतात. परंतु, आवश्यक ती सगळी मदत करून बाजूला होणं हे नेतेमंडळी करू शकत नाहीत, हा अनुभव आहे. राजकीय प्रभावविरहित साहित्य संमेलने झाली, तर त्यात साहित्यिक मूल्य वाढणे सहज शक्य आहे. आणि अनुदान व मागितलेली मदत देऊन राजकीय नेतृत्त्वाने संमेलनांपासून दूर होण्याची वेळ आलेली आहे, असे वाटते. आज पुन्हा एकदा संमेलन नाशिकलाहोते आहे. साहित्य संमेलन ही एक मराठी सारस्वतांची चळवळ आहे. ही चळवळ, माणसाची आपलं परिस्थितीचे आकलन, निरीक्षण, तत्कालीन प्रश्न, त्यावरील ज्यानी त्यांनी शोधलेली उत्तरं व्यक्त करणाऱ्या, करू शकणाऱ्या विचारवंतांची आहे. ती माघारणं, थांबणं शक्यच नाही. ती पुढेच जावी आणि जाईल हा मराठी माणसाचा हुंकार आहे.
- डॉ. विवेक राजे
९८८१२४२२२४