नवी दिल्ली : “आपल्याला आता आपली शेती रासायनिक प्रयोगशाळांतून बाहेर काढत निसर्गाच्या प्रयोगशाळेत न्यायची आहे. जेव्हा ‘नैसर्गिक प्रयोगशाळा’ असे म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ संपूर्णपणे ‘विज्ञानाधारित नैसर्गिक शेती’ असा आहे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. 16 डिसेंबर रोजी केले.
‘नैसर्गिक शेती’विषयक राष्ट्रीय परिषदेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह, कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, गुजरातचे राज्यपाल, तसेच उत्तर प्रदेश आणि गुजरातचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, “देशाच्या स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंतचा 25 वर्षांचा प्रवास, नवी आव्हाने आणि नव्या गरजांच्या अनुकूल शेतीव्यवस्थेत बदल करणारा असावा,” असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी शेतकर्यांना केले.
गेल्या सहा-सात वर्षांत, शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली असे सांगत, पंतप्रधानांनी बियाणांपासून ते मालाचे विपणन करण्यापर्यंतच्या योजनांचा उल्लेख केला. तसेच ‘किसान सन्मान निधी’पासून, ते किमान हमी भाव, उत्पादनाच्या दुप्पट निश्चित करण्यापर्यंत त्यांनी भर दिला. सिंचनाची भक्कम व्यवस्था उभारण्यापासून, ते सर्व दिशांना ‘किसान रेल्वे’चे जाळे उभारण्यापर्यंत, अशा सर्व कृषीविषयक सुधारणांचा त्यांनी उल्लेख केला. या कार्यक्रमांत सहभागी झालेल्या देशभरातील शेतकर्यांचे त्यांनी अभिनंदन केले.
प्राचीन भारतीय कृषिशास्त्र पुन्हा शिकण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, “त्यावर नव्याने संशोधन करून, ते अद्ययावत करून हे प्राचीन ज्ञान, आधुनिक विज्ञानाच्या साच्यात बसवण्याची गरज आहे.” पिकांचे उरलेले अवशेष शेतातच जाळून टाकण्याच्या पद्धतीविषयी बोलताना ते म्हणाले की, “शेतात अशी आग लावल्याने, भूमीची सुपीकता नष्ट होते, असे कृषितज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे, तरीही या घटना होत राहतात,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “असाच एक गैरसमज म्हणजे, रासायनिक खते -कीटकनाशकाशिवाय शेती चांगली होऊच शकत नाही. खरेतर वस्तुस्थिती याच्या विरुद्ध आहे.
पूर्वी जेव्हा आपण रसायनांचा वापर करत नव्हतो, त्यावेळी, आपले पीक अधिक उत्तम येत होते. माणसाच्या उत्क्रांतीच्या इतिहासाच्या अभ्यासातूनही आपल्याला हे दिसले आहे,” असे त्यांनी सांगितले. “त्यामुळे नव्या गोष्टी शिकण्यासोबतच, आपल्याला शेतीत पारंपरिक पद्धतीने शिकलेल्या चुकीच्या पद्धतीही सोडाव्या लागतील,” असेही ते म्हणाले. “शेतीचे ज्ञान कागदोपत्री बंदिस्त न ठेवता, त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्यात, ‘आयसीएआर’, कृषी विद्यापीठे आणि कृषी विज्ञान केंद्रे यांसारख्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.