अध्यात्मग्रंथांचे पारायण कसे करावे, केव्हा करावे हे मूळ ग्रंथात सांगण्याची प्रथा पूर्वी होती. तसेच त्या ग्रंथाच्या वाचनाने, पारायणाने कोणते लाभ होतात, हे सांगणारी फलश्रुती ही ग्रंथातच दिलेली असे. फलश्रुतीतील लाभार्थ्यांसाठी पारायण विशिष्ट योगावर मुहूर्तावर करावे, असेही सांगितलेले असे. समर्थांनी दासबोध ग्रंथाची पारायण पद्धती इतर ग्रंथाप्रमाणे त्यात सांगितली नाही. तथापि, दासबोधाच्या सुरुवातीस त्याची फलश्रुती सांगायला स्वामी विसरले नाहीत.
अध्यात्मग्रंथ पद्यात लिहिण्याची परंपरा तशी जुनी आहे. त्या परंपरेला अनुसरून समर्थांनीही दासबोध ग्रंथ पद्यात सांगितला, लिहिला. वास्तविक पाहता, समर्थांची भाषाशैली गद्य निवेदनाला अनुकूल आहे. तत्कालीन श्रोत्यांना त्यांची प्रवचने, कीर्तनातील निवेदने गद्यात असल्याने आवडली असतील. तरीही दासबोध ओवी छंदात सांगावा, असे समर्थांना वाटले. सर्वसाधारणपणे समर्थ पद्याचे, काव्याचे संकेत पाळतातच असे नाही. हे जरी खरे असले, तरी दासबोधातील काही ओव्या वाचताना संत ज्ञानेश्वरांची आठवण यावी, इतक्या त्या अप्रतिम आहेत. स्वामींनी दासबोधाच्या सुरुवातीस सांगून टाकले की, हा गुरुशिष्यांचा संवाद आहे आणि यात भक्तिमार्ग विशद केला आहे. तसेच, त्यात भक्ती, ज्ञान, वैराग्याचे निरुपण केले आहे. समर्थ मुखातून निघालेल्या ओव्या समथर्र्शिष्य कल्याणस्वामी यांनी लिहून ठेवल्या. त्यामुळे आज दासबोध ग्रंथ आपल्या हाती लागला आहे. अध्यात्मग्रंथांचे पारायण कसे करावे, केव्हा करावे हे मूळ ग्रंथात सांगण्याची प्रथा पूर्वी होती. तसेच त्या ग्रंथाच्या वाचनाने, पारायणाने कोणते लाभ होतात, हे सांगणारी फलश्रुती ही ग्रंथातच दिलेली असे. फलश्रुतीतील लाभार्थ्यांसाठी पारायण विशिष्ट योगावर मुहूर्तावर करावे, असेही सांगितलेले असे. समर्थांनी दासबोध ग्रंथाची पारायण पद्धती इतर ग्रंथाप्रमाणे त्यात सांगितली नाही. तथापि, दासबोधाच्या सुरुवातीस त्याची फलश्रुती सांगायला स्वामी विसरले नाहीत. त्या फलश्रुतीत प्रापंचिक वा भौतिक लाभांचा उल्लेख नाही. या ग्रंथाच्या वाचनाने अवलक्षणी सुलक्षणी होतात, आळशी साक्षेपी होतात, निंदक भक्तिमार्गाकडे वळतात. अनेक दोष नाहीसे होऊन उत्तम गती प्राप्त होते, असे फलश्रुतीत सांगितले आहे. तसेच, या ग्रंथाच्या श्रवणाने देहबुद्धी, संशय, सांसारिक उद्वेग नाहीसे होतात व मनाला समाधान मिळते. असे असले, तरी ठरावीक कालमर्यादेत ग्रंथवाचन व्हावे, यासाठी वाचक पारायणाचा मार्ग अवलंबतात. सर्वसाधारणपणे धार्मिक ग्रंथांची साप्ताहिक, मासिक पारायणे करतात. दासबोधाची तशी काही पद्धत नाही. दासबोधाची एकंदर ओवीसंख्या ७ हजार, ७५१ आहे. त्या ओव्या २० दशकात विभागलेल्या असून प्रत्येक दशकात दहा समास आहेत. दासबोध ग्रंथाची रचना पद्धतशीरपणे २० दशके २०० समास अशी दशमानपद्धतीत केली आहे. स्वामींनी जरी ग्रंथात पारायणाचा उल्लेख केला नाही, तरी वाचकांच्या सोयीसाठी लेखक प्रस्तावनेत पारंपरिक पारायणाची पद्धत देतात. ती अशी - पारायणाचा सप्ताह करण्यासाठी रोज तीन दशके वाचतात. तिसर्या दिवशी दशक सात व आठ अशी दोन दशके वाचल्यावर सात दिवसांत २० दशके पूर्ण करता येतात.
पारंपरिक पारायण पद्धतीत दासबोधातील प्रत्येक ओवीच्या शेवटी ‘श्रीराम’ असा दीर्घ उच्चार करण्याची पद्धत आहे. त्यामागील हेतू ‘रामनाम’ स्मरणात पारायण चालावे, रामाची आठवण क्षणोक्षणी व्हावी असा आहे. पण, त्यामुळे स्वामींच्या विचारधारेचा ओघ सांभाळला जात नाही. रामनामाचे महत्त्व स्वामींनी गायले आहे. रघुवीर त्यांचा सर्वेश्वर आहे. पण, तरीही प्रत्येक ओवींच्या शेवटी ‘श्रीराम’ असा उच्चार करायला स्वामी सांगत नाहीत. तसे असते तर कल्याणस्वामींनी दासबोध लिहिताना प्रत्येक ओवीच्या शेवटी ‘श्रीराम’ लिहिले नसते. असो. परंपरेत तार्किकतेला वाव नसतो. दासबोध पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी पुढील स्तवनाचे श्लोक म्हणण्याची पद्धत आहे.
गणेश शारदा सद्गुरू।
संत सज्जन कुळेश्वरू।
सर्वही माझा रघुवीरू। सद्गुरुरुपे॥
मला वाटते अंतरी त्वा वसावे।
तुझ्या दासबोधासि त्वा बोधवावे ।
अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा।
महाराजा सद्गुरू रामदासा॥
असे आणखीही स्तवनाचे श्लोक म्हणतात. त्यानंतर पाच किंवा १३ मनाचे श्लोक म्हणतात. नंतर दासबोधातील ओव्यांचे वाचन होते. त्या दिवसाच्या पारायणाचा भाग संपल्यावर शेवटी दशक २० समास दहामधील शेवटच्या २६ ते ३७ ओव्या रोज म्हटल्या जातात. त्या अतिशय अर्थपूर्ण असून त्यात समर्थांचे हृदयगत प्रकट झाले आहे. ते पुढे पाहू. नंतर कल्याणस्वामी रचित दासबोधाची आरती व दिनकरस्वामींनी लिहिलेली समर्थांची आरती म्हणतात. आरती झाल्यावर ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा’, ‘सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा’, ‘मुखी राम त्या काम बाधू शकेना’ हे तीन श्लोक सर्व मिळून मोठ्याने म्हणतात. त्यानंतर
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे।
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे।
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा॥
या नमनाच्या श्लोकाने त्या दिवसाचे पारायण संपते. ही पारंपरिक पारायण पद्धती विस्ताराने सांगण्याचे कारण की, समर्थभक्तांनी गतानुगतिक न राहता त्यामागील उद्देशांचा शोध घ्यावा व ते समजून उमजून म्हणावे. परंपरागत चांगले उद्देश जतन करावे. आता लेखात यापूर्वी निर्देश केलेल्या दशक २० समास दहामधील ओवी क्र. २६ ते ३७ यांचा सारांशरुपाने संदर्भ सांगतो. पारायण पूर्ण झाल्यावर प्रत्येक साधकाला वाटले पाहिजे की,
जाले साधनाचे फळ।
संसार जाला सफळ॥
निगुर्ण ब्रह्म ते निश्चळ।
अंतरी बिंबले॥ (२०.१०.२६)
हिशेब जाला मायेचा।
जाला निवाडा तत्त्वांचा॥
साध्य होता साधनाचा।
ठाव नाही॥ (२०.१०.२७)
निर्गुण अंतरी स्थिर झाल्याने माझ्या साधनेचे फळ मला मिळाले आहे. संसार सफळ झाला आहे. मायेशी आता माझे काही देणेघेणे उरले नाही. हिशेब संपला. आता साध्यच माझ्या हाती लागल्याने साधना साध्यात विरून गेली, असे समाधान पारायणानंतर वाटले पाहिजे. नुसते भराभर वाचन, पारायण करून दासबोध संपवणे समर्थांना मान्य नाही. त्याचा नीट शोध घेत गेले तरच परमार्थ कळतो. स्वामी सांगतात,
वीस दशक दोनीसे समास।
साधके पाहावे सावकाश॥
विवरतां विशेषाविशेष।
कळो लागे॥ (३२)
घाई न करता साधकाने स्वस्थ चित्ताने हे २०० समास अभ्यासावेत, असे स्वामी सांगतात. दासबोधातील वचने ही रामाने कृपा केल्यामुळे उतरली आहेत, तेव्हा ती भगवंताची वचने आहेत.
भक्ताचेंनी साभिमाने।
कृपा केली दाशरथीने॥समर्थकृपेची वचने।
तो हा दासबोध॥ (३०)
अशा रितीने ग्रंथाचे माहात्म्य कळल्यावर ग्रंथांची स्तुती करावी, असे वाटेल, पण त्याचे कारण नाही. त्यातील वचनांचा अनुभव महत्त्वाचा. नुसती स्तुती करून काय साधणार आहे?
ग्रंथाचे करावे स्तवन।
स्तवनाचे काय प्रयोजन॥
येथे प्रत्ययास कारण।
प्रत्ययो पाहावा ॥ (३३)
शेवटी ‘सकळ करणे जगदीशाचे। आणी कवित्वचि काय मानुशाचे।’ असे सांगून ग्रंथाचे श्रेय स्वामी नम्रपणे भगवंताला देतात. ही विचारांची कामे आहेत, तेव्हा कुठल्याही भ्रमात राहू नये, भगवंताने सर्व रचना या क्रमाने व्यवस्थितपणे केली आहे, हे ध्यानात ठेवावे. कोणाच्या बोलण्याने संभ्रमात राहू नये. भगवंताने सर्व रचना क्रमाक्रमाने व्यवस्थितपणे केली आहे, हे ध्यानात ठेवावे. पारायणाच्या शेवटी म्हटल्या जाणार्या या दशक २० समास दहामधील २६ ते ३७ ओव्यांंचा भावार्थ आपापल्या परीने जाणून साधकाने जीवाचे कल्याण करून घ्यावे. पारायणाच्या सर्व प्रक्रियेत वरील विचार ध्यानात घ्यावेत. त्याने पारायणातून आत्मोन्नती साधता येईल.
(क्रमश:)