उत्तरप्रदेश - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (19 नोव्हेंबर, 2021) महोबा येथे बुंदेलखंड प्रदेशासाठी अनेक योजनांची घोषणा केली. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन आणि विरोधकांनी त्याला दिलेले नकारात्मक वळण याविषयी अप्रत्यक्षपणे भाष्य केले.
देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी आंदोलक शेतकऱ्यांना आपापल्या घरी परतण्याचे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या एका वर्गाला हे कायदे समजावून सांगता न आल्याबद्दल देशाची माफी मागितली. ते म्हणाले की, “मला देशातील जनतेची माफी मागायची आहे. मला मनापासून सांगायचे आहे की, आमचे प्रयत्न कमी पडले असावेत की आम्ही त्यांना पटवून देऊ शकलो नाही. आज गुरु नानकांच्या प्रकाशपर्वाचा पवित्र सण आहे. आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात तीनही कृषी कायदे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करु. मी शेतकऱ्यांना त्यांच्या घरी परतण्याचे आवाहन करतो"
त्यानंतर पंतप्रधान उत्तरप्रदेशमध्ये विविध योजनांच्या पायाभरणी संमारंभामध्ये सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाला कशा पद्धतीने विरोधकांनी नकारात्मक वळण दिले याविषयी भाष्य केले. विरोधी पक्षांच्या राजवटीची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "जंगले, संसाधने माफियांच्या ताब्यात कशी दिली गेली, हे कोणापासून लपलेले नाही. ते म्हणाले की, आता या माफियांवर बुलडोझर चालत असल्याने काही लोक राडा करत आहेत. या लोकांनी कितीही त्रास दिला तरी उत्तर प्रदेशच्या विकासाचे, बुंदेलखंडच्या विकासाचे काम थांबणार नाही." पीएम मोदी म्हणाले की, "शेतकऱ्यांना नेहमीच समस्यांमध्ये अडकवून ठेवणे हा काही राजकीय पक्षांचा आधार आहे. ते समस्यांचे राजकारण करतात आणि आम्ही निराकरणाचे राजकारण करतो, असे ते म्हणाले.,