मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती सुरु आहे. सुप्रसिद्ध अभिनेता शारुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणात अटका करण्यात आली आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडेंवर आरोप करण्यास सुरुवात केली. यानंतर क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कुटुंबावर होणारे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. यावरून आता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित, 'मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय हवा,' अशी मागणी केली आहे.
क्रांती रेडकर यांनी पत्रामध्ये म्हंटले आहे की, "माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये हे त्या दोघांनी शिकवलं. तोच धडा घेऊन मी आज एकटीनं माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरुद्ध उभी आहे. लढते आहे. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत."
पुढे त्यांनी पत्रात म्हंटले आहे की, "आज बाळासाहेब असते तर त्यांना नक्कीच हे पटले नसते. आज ते नाहीत पण तुम्ही आहात. त्यांची सावली, त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहते आहे. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती."