मुंबई : मालाडमधील मालवणी चाळ क्र. ८ आणि ९ या चाळीतील अनधिकृत मशिदीवरील चार भोंगे ईदनंतर हटले असून, या चाळीला पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे. मालवणीच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की, जिथे मशिदीवरील भोंगे हटले आणि मुस्लीमबहुल वस्तीत संख्याबळाने नगण्य असलेल्या नवबौद्ध समाजातील कुटुंबांना संरक्षण मिळाले. २०१५ पासून २०२१ पर्यंत चाळीतील नवबौद्ध समाजाच्या भगिनी यासाठी संघर्ष करत होत्या. झुंडशाहीद्वारे त्यांना प्रचंड मानसिक त्रास दिला गेला. मात्र, ‘भीमराज की बेटी मैं तो जय भीमवाली हूं,’ म्हणत, या महिलांनी महाकाय झुंडशाहीविरोधात संघर्ष कायम ठेवला. सात-आठ कुटुंबांतील या भगिनी, गृहिणी आहेत. पण, मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजामुळे होणार्या त्रासाविरोधात आणि झुंडशाहीविरोधात त्या संघर्ष करत राहिल्या. शेवटी त्यांच्या संघर्षाला यश आले. या मशिदीवरील भोंगे हटले असून, चाळीला पोलीस संरक्षणही मिळाले आहे.
दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या बातमीचा परिणाम
“२०२१ च्या सुरुवातीला या मशिदीचे भोंगे पहिल्यांदा बंद झाले होते. मुंबई भाजप अध्यक्ष आणि आ. मंगलप्रभात लोढा यांनी आवाज उठविल्यानंतर हे भोंगे बंद करण्यात आले होते. पुढे रविवार, दि. २४ सप्टेंबर रोजी नियोजनबद्ध पद्धतीने या मशिदीचे भोंगे पुन्हा सुरू करण्यात आले. दडपशाही, झुंडशाही करण्याचा प्रकार परिसरात पुन्हा सुरू झाला. त्यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने आमच्या दुःखाला वाचा फोडली. याबाबत त्यांनी वृत्त प्रसिद्ध केले. त्या वृत्ताचा परिणाम इतका मोठा होता की, ‘सीबीआय’चे अधिकारी या बातमीची विचारणा करत आमच्याकडे आले. बातमी देणार्या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांची चौकशी करण्यात आले. आम्ही योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन ‘सीबीआय’च्या अधिकार्यांना दिले. त्यानंतर पुन्हा आ. मंगलप्रभात लोढा आमच्यासाठी मैदानात उतरले. आ. नितेश राणेही येऊन गेले. आ. मंगलप्रभात लोढा अणि दै. ‘मुंबई तरुण भारत’मधील ‘त्या’ बातमीमुळे आमच्या मालवणीत पहिल्यांदा अनधिकृत मशिदीवरचे भोंगे उतरवले गेले, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. याबद्दल आम्ही या दोघांचेही खूप खूप आभारी आहोत,“ अशी माहिती भीमकन्या शुभांगी जाधव, रोहनी निळे, वर्षा पारवे, अपर्णा सुतार, माया पाटील यांनी दिली.
मालवणीच नाही, तर संपूर्ण मुंबईमध्ये असे प्रकार
केवळ मालवणीच नाही, संपूर्ण मुंबईमधून सध्या असे प्रकार उजेडात येत आहेत. मालवणीमधील जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा मी अस्वस्थ झालो. मालवणीमध्ये समाजबांधवांनी एकत्रितपणे या प्रकाराविरोधात लढा दिला. त्या लढ्यात आम्हीही मालवणीवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो. अनधिकृत मशिदीवरील भोंगे उतरवले गेले, हे एकजुटीच्या लढ्याचे यश आहे. मुंबईमध्ये ज्याठिकाणी या घटना होत आहेत, तेथेही समस्या सोडवण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येतील.
- आ. मंगलप्रभात लोढा, अध्यक्ष, मुंबई भाजप