श्रीमंतीच्या छानछोकी काळात समाजात सायकल संस्कृती रुजवणारे दोन चाकांचे प्रवासी प्रा. नारायण बारसे यांचा प्रवास अवर्णनीय...
‘सायकल’ या चार अक्षरी शब्दाने एका ठाण्यातील अवलियाला चार दशकांहून अधिक काळ साथ केली. शाळा, महाविद्यालय या प्रवासात सायकल अनेकांची सोबती असते. पण, त्यानंतर स्थिरस्थावर झाल्यावर ही सायकल अडगळीत जाऊन त्याची जागा मोटारसायकल किंवा चारचाकी गाडी घेते, असे जरी असले, तरी ठाण्यातील ५२ वर्षीय सायकलप्रेमी प्राध्यापक नारायण बारसे यांचा सायकल प्रवास हा खूपच रंजक आणि सुरक्षित असा आहे. किंबहुना, वाढत्या इंधनदरामुळे आज किफायतशीरदेखील ठरला आहे.
मूळचे शिर्डी, कोपरगावचे प्रा. नारायण बारसे हे ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयाचे मुख्य ग्रंथपाल म्हणून कार्यरत असले, तरी उच्चविद्याविभूषित पात्रतेमुळे गेली २७ वर्षे प्राध्यापकीही करतात. संपूर्ण शालेय शिक्षणप्रवासात त्यांना सायकलने साथ केली. तसेच ते जेथे जेथे शिक्षणसाठी जात असत, तेथे सायकलच त्यांच्या सोबतच होती. पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने ते प्रथम मुंबई आणि नंतर ठाण्यात स्थायिक झाले. मधला काही काळ सायकलची साथ सुटली. पण, सायकलवरील प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच होते. वयपरत्वे शारीरिक व्याधी जडल्या आणि या व्याधीवर सायकलच्या साथीने आपण मात करू, असा विश्वास त्यांना वाटू लागला. वाढलेला कोलेस्ट्रोलचा स्तर, अनियमित रक्तदाब, नेहमीच १०० च्या वर राहणारा पल्स रेट, ९३ किलो वजन अशी अतिशय भीतिदायक आरोग्य स्थिती उद्भवल्यानंतर पुन्हा ते सायकलकडे वळले अन् काय, सायकल चालवू लागल्याने यातले बरेच आकडे पुन्हा सकारात्मकरीत्या बदलले. अतिशय आरोग्यदायी पद्धतीने १७ किलो वजन त्यांनी कमी केले. हे करत असताना त्यांनी इतरांनाही सायकल चालविण्याचे फायदे सांगून सायकलिंगसाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे महाविद्यालयातील काही कर्मचारी आणि विद्यार्थी नियमितपणे सायकलने प्रवास करु लागले.
शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही कधी ५०, तर कधी १०० किमीपेक्षा अधिक सायकलिंग करणे हे त्यांचे नित्यकर्मच. फेब्रुवारी २०२० मध्ये तीन दिवसांत ठाणे, सिन्नर, कोपरगाव, शिर्डी, येवला, मनमाड, मालेगाव, नाशिक, कसारा असा तीन दिवसांत ४५० किलोमीटर सायकल पर्यटनाचा आनंद त्यांनी लुटला. महाराष्ट्रातील बरेच महत्त्वाचे घाट सायकलने पार केले. ठाण्याच्या जवळपास असलेल्या १०० किलोमीटर अंतरात असलेल्या सर्व पर्यटनस्थळांची सायकल सफर केली. गेल्या चार वर्षांत जवळ जवळ २४ हजार किमी सायकल चालवून झाल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांची आवडती ‘फायरफॉक्स टार्गेट’ ही सायकल बदलून नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी ‘स्कॉट सबक्रोस ४०’ ही सायकल खरेदी केली. नवीन सायकलनेसुद्धा एक लाख २० हजारांपेक्षा अधिक किमी अंतर कापले असून, तब्बल ४० वेळा शतकी किमी सायकल प्रवास केल्याचे बारसे सांगतात.
नवीन वर्षाची सुरुवात त्यांनी १ जानेवारीला ५० किमी सायकलिंगने केली. सायकलच्या माध्यमातून खूप चांगली माणसे त्यांना जोडता आली. यामध्ये डॉक्टर्स, अभियंते, वकील, प्राध्यापक, आयटी क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी, ग्रंथालय क्षेत्रात काम करत असलेले विद्यार्थी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविलेल्या अनेक लोकांशी स्वत:ला जोडता आल्याचे ते सांगतात. सायकल शर्यती हा जसा साहसी स्पर्धात्मक क्रीडाप्रकार आहे, तसाच तो फावला वेळ उत्तमरीत्या घालविण्याचा व व्यायामदायी असा प्रकार आहे. सायकल वापरण्याचे फायदे अनेक आहेत. आधुनिक काळात डॉक्टर रुग्णाने सायकल चालवावी, असा सल्ला ते देतात. सायकल चालविण्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत तर होतेच. परंतु, मूळ चयापचय क्रियेसाठी सायकल चालविण्याचा व्यायाम पोषक असल्याचे ते स्वानुभावावरून सांगतात. सायकल सुरक्षा ही अतिशय महत्त्वाची असून, सायकल सुरक्षेचा प्राधान्याने विचार करायला हवा. सायकल चालवताना चालविणार्यांच्या सुरक्षेसोबतच रस्त्यावर चालणाऱ्या पादचार्यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते सांगतात. सायकल चालवताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा सायकलचालक सिग्नल जणू आपल्यासाठी नाहीच, अशा अविर्भावात सिग्नल लाल रंगाचा असतानासुद्धा सायकल दामटवतात. तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सायकलचा वापर करताना जबाबदारीने नियमांचे पालन करून सायकल चालविणे गरजेचे असल्याचे ते सांगतात.
सर्वसाधारणपणे सुरक्षेच्या दृष्टीने पुढील सायकल सुरक्षा साहित्याचा गरजेनुसार आपण वापर करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने लाईट, हेडलाईट, रिफ्लेक्टर, सिग्नल लाईट, हॉर्न, घंटी, हेल्मेट, सायकल आरसा, हातमोजे, बॉटल होल्डर, सायकलिंगसाठी पाणी बॉटल, सायकलिंगसाठी विशिष्ट कपडे (shorts, T Shirts, knee cap)सायकलिंगसाठीचा चष्मा, बूट इत्यादी मूलभूत गोष्टी सायकलिंगसाठी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याचा सल्ला ते देतात. कोरोनाकाळातही या अवलियाने आठ हजार ५०० किलोमीटर सायकलिंग केले आहे. पेशाने जरी प्राध्यापक असले तरी आज सायकलिंगचे प्रशिक्षण हे ते अगदी उत्तम देऊ शकतात, हे त्यांच्या सायकल सवारीमुळे लक्षात येते. त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.
- दीपक शेलार