मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध मोहीमेला यश येत आहे. दोन दिवसांपूर्वी अतिजोखीम संपर्कातील तब्बल दोन हजार ६२७ व्यक्तींचा शोध घेण्यात आला. तर अति जोखीम जनसंपर्कातील २,९३६ व्यक्तींना क्वारंटाईन सेंटर मध्ये पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
लाॅकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने अन्य व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते, अशा कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची शोध मोहीम पालिका आरोग्य विभागाने सुरु केली. मुंबईच्या विविध भागातून दोन दिवसांपूर्वी अति जोखीम कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात २,६२७ व्यक्ती, तर अति जोखीम जनसंपर्कतील २ हजार ९३६ व्यक्तींचा शोध घेत कोरोना काळजी केंद्र १ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असून पालिकेच्या आरोग्य विभागाने २४ विभागांमध्ये आरोग्य स्वंयसेविका व स्थानिक स्वयंसेवक घरोघरी व झोपडपट्टीत जाऊन सर्वेक्षण करत आहेत. मुंबईच्या २४ विभागातील सर्वेक्षणासाठी टीम तयार केली आहे. ही टीम घरांचे सर्वेक्षण करत असून ही सर्वेक्षण मोहीम एखाद्या विभागात एकदा राबवली गेली असली तरी पुन्हा त्याच भागात जाऊन पुन्हा सर्वेक्षण करते. आतापर्यंत ७ लाख २५ हजार ७१९ व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन तपासणी करत संशयीतांचे स्वॅब घेणे, अॅटिजेनी टेस्ट यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.