मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांची माहिती!
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे पथक मुंबईत सात दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी आले, तर त्यांना क्वारंटाईन केले जाणार नाही, असे इकबालसिंग चहल यांनी सांगितले आहे.
सात दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी सीबीआयचे अधिकारी मुंबईत येतील तर त्यांना मुंबई महापालिकेला ईमेल करुन क्वारंटाईनमधून सूट मिळवण्यासाठी अर्ज कारावा लागेल. त्यानंतर आम्ही त्यांची क्वारंटाईन पीरियडमधून सूट देऊ, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंग चहल यांनी म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने सीबीआयला दिला आहे. यानंतर सीबीआयची टीम उद्याच मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इकबालसिंग चहल यांनी हे वक्तव्य केले आहे. मागच्यावेळी बिहारचे पोलीस अधिकारी विनय तिवारी हे सुशांतसिंग प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांना हातावर शिक्का मारून क्वारंटाईन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टानेही अधिकाऱ्याला अशाप्रकारे क्वारंटाईन करण्यावरून नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरण मुंबई पोलिसांनीच तपासावे यासाठी आग्रही असणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केलेले आहे. मुंबई पोलीस सीबीआयच्या तपासाला सहकार्य करतील, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.