उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या १० तसांच्या बैठकीनंतर चीनी सैन्याची माघार!
नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातून चीनने आपले सैन्य दीड ते दोन किलोमीटर मागे घेतले आहे. चिनी सैन्याने १.५ ते २ किमी पर्यंत आपले तंबू मागे घेतले आहेत. हे तंबू चीनने पेट्रोलिंग स्थान १४ च्या मागे घेतले आहेत. पेट्रोलिंग पॉइंट १४ ही तिच जागा आहे जिथे १५-१६ जून दरम्यान रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झटापटीत २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. चीनने हे तंबू तणाव निवळण्यासाठी केलेल्या चर्चेनंतर हटवले आहेत. दोन्ही देशांनी डिसएंगेजमेंटवर सहमती दर्शवली आहे. या अंतर्गत सैन्य सध्याच्या ठिकाणावरुन मागे हटले आहे. तणाव निवळण्यासाठी भारतीय सैन्य आणि चिनी सैन्यांमध्ये नियंत्रण रेषेवर बफर झोन बनवण्यात येणार आहेत.
३० जून रोजी भारत आणि चीन यांच्यातील कमांडर स्तरावर तब्बल दहा तास चर्चा झाली. पूर्व लडाख आणि गलवान खोऱ्याच्या परिसरात यापुढे दोन्ही सैन्यांमध्ये हिंसक झटापटी होणार नाहीत, तसेच दोन्ही देशांच्या जवानांदरम्यान वारंवार शाब्दिक बाचाबाचीही होणार नाही, यासाठी करावयाच्या उपाय योजनांवर चर्चा ही चर्चा झाली. या बैठकीत चीन वारंवार एलएसीबाबत नवनवे दावे करत आहे आणि कोणतीही एक सीमा निश्चित मानत नसल्याचे उघड झाले आहे. तसेच चीनी सैन्याने एलएसी परिसरात आणि गलवान खोऱ्यात वाढवलेली सैन्य कुमक मागे घ्यावी असा या कमांडर स्तरीय चर्चेत भारताचा आग्रह राहिलेला आहे.