"आदिवासी हिंदू नाहीत?", डाव्यांकडून धर्मप्रसारणासाठी 'ब्रेनवॉशिंग'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-May-2020
Total Views |
Chagan Aware _1 &nbs



विचारधारेच्या नावाखाली धर्माला नख लावण्याचा प्रयत्न


आदिवासी तरुणाईला स्वतःच्या हिंदू धर्मापासून परावृत्त करण्याचे काम डाव्या विचारसरणींकडून केलं जात आहे. 'तुम्ही हिंदू नाहीच आहात, असे ब्रेन वॉशिंग सोशल मीडियाद्वारे केले जात असून याच कटातून या मुलांना आपल्या विचारसरणीकडे वळवण्याचा किंवा धर्मांतरण करण्याचा मनसुबा दिसत असल्याचे 'महा एमटीबी'च्या ग्राऊंड रिपोर्टमध्ये उघड झाले. डहाणू तालुक्यातील छगन बच्चू आवरे यांनी या प्रकाराला वाचा फोडली.
 
 
 
साधूंची कट रचून हत्या करण्यात आलेला डहाणू तालुका गेल्या काही दिवसांपासून देश पातळीवर प्रकाश झोतात आला. ज्या प्रकारे दोन साधू आणि एका ड्रायव्हरची जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली त्याने संपूर्ण देश हादरून गेला होता. या घटनेचा मागोवा घेण्यासाठी 'महाएमटीबी'ची टीम पालघर जिल्ह्यात दाखल झाली. तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधून या प्रकरणावर त्यांची भूमीका काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस आले आहेत.
 
 
 
या गावातील स्थानिक छगन आवरे यांनी सांगितल्याप्रमाणे, 'डाव्या संघटना इथल्या तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आदिवासींचा मूळ धर्म हा हिंदू नाहीच. त्यामुळे त्यांनी आपला धर्म मानू नये, असे वारंवार त्यांच्या मनावर बिंबवण्याचे काम सोशल मीडियाद्वारे करण्याचा प्रयत्न केला जात आहे.', असा आरोप त्यांनी केला. तिथल्या मुलांना त्यांच्या स्वधर्मापासून दूर करायचे आणि धर्मांतरण तसेच डाव्या विचारसरणीकडे वळवायचे त्यासाठी सगळी तरुणांच्या मेंदूची 'मशागत' सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. यासाठी तरुणांमध्ये तसेच इथल्या स्थानिकांमध्ये हिंदू धर्मीयांविषयी जागृती होणे अधिक गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
आदिवासींइतका कुणी कट्टर हिंदू नाही !
 
 
डाव्या विचारसरणीतर्फे कुणीही आदिवासी हिंदू नाही, असे वारंवार लोकांच्या मनावर बिंबवले जाते. आवरे यांनी त्यांचा दावा साफ खोडून काढत, 'आदिवासींइतका हिंदुत्व मानणारा कुठलाही समाज नाही', असेही ते सांगतात. "इथली संस्कृती ही मूळ हिंदू धर्मातूनच आलेली. हिंदू धर्मातील इथल्या चालीरिती नियम प्रथा-परंपरा ज्या प्रकारे आजही या भागात जपल्या जातात, घरोघरी हिंदूत्वाचे पाईक तुम्हाला मिळतील. लग्न समारंभातील 'राम राम' असो कि व्यक्तीच्या निधनानंतर वाडा भरताना शंकराची केली जाणारी आठवण सर्व पद्धती या हिंदू धर्मानुसारच पाळल्या जातात. इथे जन्म झालेल्या मुलांची नावे रामा, लक्ष्मण, शंकर, गंगा, गंगी, सिता, नवसानंतर झालेल्या मुलाचे नाव नवशा, चैत्र महिन्यात जन्मणाऱ्या मुलांचे नाव चैत्या ठेवले जाते. सण समारंभही हिंदूंचेच साजरा केला जातो."
 
 
 
मंदिरामध्येही आदिवासी समाजातील पुजारी
 
 
पालघर जिल्ह्यातील हिंदू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळे असलेल्या मंदिरांमध्ये आदिवासी समाजातील पूजारी पूजा अर्चा करतात. इथला समाज हिंदू परंपरा, चालीरिती जपणारा आहे. भारतीय संस्कृतीतील महत्वाचा घटक मानल्या प्रथा आणि वारसा पुढील पीढीकडे सोपवत असताना त्याला नख लावण्याचे काम डाव्या संघटना करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातो.
 
 
 
धर्मांतरासाठी 'जमीन' भूसभुशीत करण्याचा प्रयत्न
 
 
तरुणांना सोशल मीडियाद्वारे हिंदू धर्माबद्दल खोट्या गोष्टी सांगून तुम्ही हिंदू नसल्याचा प्रसार करून डाव्या संघटनावादी कार्यकर्ते एक प्रकारे ब्रेन वॉशिंग करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. एकदा तरुण आपला धर्म विसरला कि, त्यांचे धर्मांतरण करायचा, असा डाव या संघटनांचा असल्याचेही स्थानिक सांगतात.




@@AUTHORINFO_V1@@