ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर फेसबूक कमेंट करणाऱ्या अनंत करमुसे यांना झालेली मारहाण हा गंभीर प्रकार आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांनी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे, मोबाईल टॉर्च प्रज्वलित करण्याच्या आवाहनावर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर घोडबंदर रोड येथील नागरीक अनंत करमुसे यांनी कमेंट केली होती. त्यावरुन गणवेशातील दोघा पोलिसांसह चौघा जणांनी करमुसे यांना घरातून मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले होते. त्यानंतर ५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी आव्हाडांच्या उपस्थितीतच १५ ते २० जणांनी करमुसे यांना मारहाण केली होती. त्यावेळी करमुसे यांच्या डोक्याला व चेहऱ्याला मार लागणार नसल्याची दक्षता घेण्याची सुचना केली होती. पोलिसांच्याच फायबर काठीने मारहाण झाली असल्याचा करमुसे यांचा आरोप आहे. या मारहाणीच्यावेळी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती होती, असे वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत करमुसे यांनी म्हटले आहे.