नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविला आहे. यानिर्णयांनंतर गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, देशात अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. याचबरोबर सर्व लोकांना मार्गदर्शक सूचना पाळण्याचे आवाहनही केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, 'आज संपूर्ण जगालाच या जागतिक महामारीचा सामना करावा लागत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनतेने या विरोधात लढा देण्याचे एक यशस्वी उदाहरण जगासमोर सादर केले आहे. सरकारने वेळेत घेतलेले सर्व निर्णय आणि याला जनतेने दिलेला पाठिंबा हेच प्रतिबिंबित करतात.' दुसर्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'पंतप्रधान मोदींनी भारतीयांचे रक्षण करण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि ३ मे पर्यंत देशातील लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल मी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानतो.'
गृहमंत्री म्हणाले की, आज केंद्र व राज्य सरकार एकत्र काम करत आहेत. सर्व राज्य सरकारे ज्या प्रकारे केंद्र सरकारबरोबर एकत्र काम करत आहेत ते खरोखर कौतुकास्पद आहे. आता आम्हाला हे समन्वय अधिक वाढवावा लागेल जेणेकरून लॉकडाऊनची योग्यप्रकारे हाताळली जाईल. कोणत्याही नागरिकाला जीवनावश्यक असलेल्या गोष्टींसाठी त्रास होणार नाही. पुढे ते म्हणाले,'कोणत्याही देशवासियांना चिंतीत होण्याची आवश्यकता नाही. देशाचा गृहमंत्री म्हणून मी जनतेला खात्री देतो की देशात अन्न, औषधे आणि इतर दैनंदिन वस्तूंचा मुबलक साठा आहे, त्यामुळे कोणत्याही नागरिकाने चिंतीत होऊ नये. त्याचबरोबर मी धनिकांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावे आणि जवळपास असलेल्या गरीब व गरजुंना मदत करावी.'
सफाई कामगारांच्या सहकार्याचे कौतुक करताना शाह म्हणाले की, 'या लढाईत महत्वाची भूमिका बजावणारे आमचे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार, पोलिस आणि सर्व सुरक्षा कर्मचारी यांचे योगदान अतिशय हृदयस्पर्शी आहे. या विचित्र परिस्थितीत आपले धैर्य आणि समजूतदारपणा प्रत्येक भारतीयांना प्रेरणा देणारा आहे. प्रत्येकाने मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केले पाहिजे आणि सरकारला सहकार्य केले पाहिजे.'