मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचे सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, कामकाजाच्या तुलनेत राज्यातील हे महाविकास आघाडीचे सरकार आधीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारपेक्षा काहीसे सुस्त असल्याचे चित्र आहे.
राज्यात तीन पक्षांनी स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार कामाला लागले असले तरी पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या तुलनेत नवीन सरकारचा वेग कमी आहे. पहिल्या दोन महिन्यांत उद्धव सरकारने १३ मंत्रिमंडळ बैठकांत २४ निर्णय घेतले. त्यापैकी जुन्या सरकारच्या ४ निर्णयांना स्थगिती देण्यासंबंधीचे होते. फडणवीस सरकारमध्ये पहिल्या २ महिन्यांत ११ मंत्रिमंडळ बैठका झाल्या. त्यात २५ नवेकोरे निर्णय घेण्यात आले. जुन्या सरकारच्या निर्णयांना त्यात स्थगिती देण्यात आली नव्हती.