पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हिंदू विरोधी आहेत. ते देवाला मानत नाहीत. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका, असे पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढले आहे. पूर्वीचे राज्यकर्ते साधना करणारे देवनिष्ठ, धर्मनिष्ठ, विनम्र होते. आताच्या नास्तिक राज्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करणे किंवा त्यांचे व्याख्यान ठेवून पांडुरंगाची अवकृपा करुन घेऊ नका, असे राष्ट्रीय वारकरी परिषदेने या पत्रकात सांगितले आहे.
‘शरद पवार हे रामायणाची आवश्यकता नाही म्हणतात. मुख्यमंत्री असताना पांडुरंगाच्या महापूजेला गैरहजर राहतात. समर्थ रामदास स्वामींचा एकेरी उल्लेख करतात. देव, संत, व्रत, वारी, हिंदू धर्म यांचा अपमान करणाऱ्या, संत तुकाराम वैकुंठास गेले नाहीत, संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली नाही, असे पुस्तक-लेख लिहिणाऱ्या तथाकथित पुरोगामी संघटनांना त्यांचा सातत्याने पाठिंबा असतो.’ असे या पत्रकात लिहिले आहे.
‘यापुढे वारकऱ्यांना सावध राहावे व वारकरी प्रथम हिंदू आहे हे लक्षात ठेवावे. हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या राज्यकर्त्यांनाच अशा धार्मिक कार्यासाठी बोलवावे. व्यक्तिनिष्ठा पक्षनिष्ठा यापेक्षा ईश्वरनिष्ठा महत्वाची आहे. पैशाच्या लालसेपोटी जरी अशा मंडळींना कोणी बोलवत असेल, तरी तो अधर्मच आहे. राज्यकर्ते देवांना मानत नाहीत, मग आपण त्यांना का मानायचे? असा संतप्त सवाल वक्ते बाबांनी उपस्थित केला’ असा पत्रकामध्ये उल्लेख आहे.