अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याने आमठाट्या केली. या आत्महत्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची फसवी घोषणा जबाबदार असल्याची टीका भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघीच्या सरकारवर तोफ डागत टीकास्त्र सोडले आहेत.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर डागली तोफ
नगर जिल्ह्यातील मुळा-प्रवरेच्या परिसरात वाळू तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महसूल अधिकारी त्याकडं दुर्लक्ष करत असल्याचा विखे-पाटील यांचा आरोप आहे. "महसूलमंत्र्यांच्या तालुक्यामध्ये वाळू माफियांचेच वर्चस्व दिसत आहे. त्यांनीच हे वाळू माफिया निर्माण केले आहेत. आपल्या जवळच्यांना पाठीशी घालण्याऱ्या धोरणामुळेच हे सगळे घडते आहे." असा थेट आरोप विखे पाटलांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांवर केला आहे.
"संपूर्ण राज्यामध्ये वाळू माफियांकडून महसूल अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ले केले जात आहेत. मात्र, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. महसूलमंत्री याबाबतीत गप्प आहेत. ते स्वत: आपल्या जवळच्यांना पाठीशी घालत आहेत. खुद्द त्यांच्याच तालुक्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. या सगळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे.
"मुख्यमंत्र्यांच्या फसव्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या"
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सांगितले की , " शेतकरी आत्महत्यांना सरकारच्या फसव्या घोषणा जबाबदार आहेत. ठाकरे सरकारला लोकांच्या चिंता वाढत असताना महाविकास आघाडी सरकारची सत्ता टिकवण्याची चिंता वाटत आहे. आघाडी सरकारचं हे राजकारण जनता बघत आहे."