काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर बिहार निवडणुकीच्या पराभवाची कारणेही आताच तयार करा

    09-Jun-2025
Total Views | 7
 
Chief Minister Devendra Fadnavis on congress
 
 
मुंबई: “राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रिया आणि जनादेशाचा सातत्याने अपमान करतात. जनतेने त्यांना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे,” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, एकदा पराभव स्वीकारून आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला, तर ते अधिक संयुक्तिक ठरेल,” असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिला. त्याचप्रमाणे, “बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणेही त्यांना आतापासून तयार करायची आहेत,” असा टोलाही लगावला.
 
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याबाबत त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेला लेख चर्चेत होता. त्यात त्यांनी पाच टप्प्यांद्वारे गंभीर आरोप केले. तसेच, महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ होण्याची भीती व्यक्त केली होती. यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेखाद्वारेच राहुल गांधी यांना सडेतोड उत्तर दिले आहे. “महाराष्ट्रातील पराभवामुळे त्यांना आणि त्यांच्या मित्रपक्षांना किती दुःख झाले आहे, हे मला माहीत आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी, लाडक्या बहिणी, सामान्य जनता आणि सर्व नागरिकांच्या जनादेशाचा अशा प्रकारे अपमान करत राहिलात, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही,” असे फडणवीसांनी लेखात म्हटले आहे.
 
मनमोहनसिंग सरकारमध्येच मतदार वाढले
 
“काँग्रेसच्या काळात निवडणूक आयुक्त सरकारने थेटपणे निवडले. 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले. प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेत्यासह आयुक्त नियुक्तीसाठी आयोग नेमला. मोदी सरकारपेक्षा मनमोहनसिंग सरकारमध्येच मतदार वाढले आहेत,” असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी केला.
 
‘मतदारसंख्यावाढीत काहीही असाधारण नाही’
 
“2014 ते 2019 दरम्यान देशभर 63 लाख मतदार वाढले. 2019 ते 2024 दरम्यान देशभर 75 लाख मतदार वाढले, तर 2004 ते 2009 दरम्यान देशभर एक कोटी मतदार वाढले,” असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. “2024 मध्ये मतदारसंख्यावाढीत काहीही असाधारण नाही,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
शेवटच्या मतदान टक्केवारीत वाढ
 
“2024च्या लोकसभेच्या दुसर्‍या टप्प्यात सायंकाळी 5 वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी 60.96 टक्के इतकी, जी दुसर्‍या दिवशी 66.71 टक्के इतकी अंतिम झाली. यातील वाढ 5.75 टक्के इतकी, पण ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपवून ठेवणार का? दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार, 1 लाख 427 मतदान केंद्रांवर प्रतिमिनिट 97 हजार, 103.32 इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जे मतदान सायंकाळी 6 वाजेनंतर झाले आहे. त्याची सरासरी काढली, तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ 18 मिनिटे, 23 सेकंद इतका आहे,” असेही फडणवीसांनी सांगितले आहे.
 
मतदान टक्केवारीत वाढीने जिंकल्याचे हास्यास्पद
 
“ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदार टक्केवारीत वाढ झाली. तेथे एनडीएच जिंकली, हे तर आणखी हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देत आहे. माढ्यात 18 टक्के वाढ दिसते, जेथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला आहे. वणीत 13 टक्के वाढ आहे, जेथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आहे. श्रीरामपूर येथे 12 टक्के वाढ, जेथे काँग्रेस जिंकली आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121