दुध व्यवसाय, भाजी मार्केट व इतर दुकाने स्वेच्छेने सुरूच
मुंबई: शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला वसई- विरार मधून संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत असून शहरातील सर्व व्यवहार सुरळीत ठेवण्यात आलेले आहेत. आज सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून, शहरातील काही दुकाने बंद तर काही दुकाने दुकानदारांनी स्वेच्छेने सुरू ठेवली आहेत. तसेच रस्तेवाहतूकही सुरळीत असून इतरही सर्व आवश्यक बाबी सुरूच आहेत.
देशात विविध ठिकाणी पुकारलेला बंद आजच्या एका दिवसापुरताचं असला तरी भाजीपाला व दुध व्यवसायावरसुद्धा याचा फारसा परिणाम झालेला आढळून आलेला नाही. वसईच्या ग्रामीण भागातही ‘बंद’ला अगदीच कमी प्रमाणत प्रतिसाद पाहायला मिळाला मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरात पोलिसांचा मात्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सध्या देशातलं वातावरण शेतकरी आंदोलनावरून प्रचंड तापलेलं आहे. आणि अशातच काही पक्षांनी भारत बंद चे आवाहन केले होते. अनेक ठिकाणी या ‘बंद’वरून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. शेतकरी आंदोलन हळूहळू आता राजकीय वळण घेताना दिसत आहे. तरीही लाखांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर सुटण्याची आशा सर्वत्र व्यक्त होत आहे.