मुंबई : भारताच्या कोरोनानंतरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने एकदिवसीय मालिका गमावली असली तरी टी - २० मालिकेत २ - १ असा विजय मिळवला आहे. आता भारताचे लक्ष हे कसोटी मालिका विजयाकडे असेल. याआधी भारतीय संघाच्या दृष्टीने अनेक चांगल्या बातम्या समोर आल्या आहेत. भारत अ आणि ऑस्ट्रलिया अ च्या सराव सामन्यामध्ये अजिंक्य रहाणे आणि जसमीत बुमरहाने अर्धशतकाची खेळी करत मालिकेसाठी तय्यार असल्याचे सिद्ध केले आहे. तर, दुसरीकडे भारताचा सलामीवीर रोहित शर्माने सर्व फिटनेस चाचण्या पास केल्याचेदेखील सांगण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताच्या फलंदाजांची अवस्था खराब झाली. कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही, पण दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जसप्रीत बुमराहने अर्धशतकी खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहने ऑस्ट्रेलिया अ च्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. बुमराहने ५७ चेंडूंमध्ये नाबाद ५५ धावा केल्या. यामध्ये त्याने ६ चौकार तर २ षटकार लगावले.
दुसरीकडे, बंगळुरु येथे एनसीएमध्ये अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने सर्व फिटनेस चाचण्या पास केल्या आहेत. या बातमीमुळे भारतीय चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पुढे, १२ तारखेला रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना होण्याची शक्यता असून ऑस्ट्रेलियात रोहित १४ दिवसांच्या विलगीकरणात राहणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ‘आयपीएल’दरम्यान मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला काही साखळी सामन्यांना मुकावे लागले. त्यामुळेच रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली नव्हती. आता जवळपास एक महिना तंदुरुस्तीवर लक्ष दिल्यावर ‘एनसीए’चे प्रमुख राहुल द्रविड, फिजिओ आणि निवड समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितची चाचणी झाली. ही फिटनेस चाचणी रोहित शर्मा पास झाला आहे.