बांग्लादेशींच्या घुसखोरीसाठी एमआयएम आमदारांचा पाठींबा
मुंबई : बांग्लादेशींना बेकायदेशीर रित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलीसांनी गजाआड केले आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्रातील एमआयएमच्या दोन आमदारांची सही असलेली लेटरहेड जप्त करण्यात आली आहेत. कायमच बेकायदेशीर व देशविघातक कृत्य करणाऱ्या एमआयएम पक्षाचा देशद्रोही चेहरा पुन्हा एकदा उघड झाला असल्याचा आरोप भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मुंबईत साकीनाका पोलीसांनी सोमवारी अटक केलेल्या टोळीने एमआयएमचे आमदार मुफ्ती मुहम्मद इस्माईल अब्दुल खलील आणि आमदार शेख आसिफ शेख रशीद यांच्या लेटर हेडचा वापर करून मुंबईसह, नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबादसह भारतातील विविध शहरांमध्ये बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याकरिता बनावट सरकारी दस्तावेज तयार केले आहेत. हे काम सर्रासपणे सुरू होते. एमआयएमच्या आमदारांची सात कोरी लेटरहेडही आढळली आहेत.
हा अत्यंत घातक व धक्कादायक प्रकार असून भारतात बांग्लादेशींना घुसखोरी करण्यासाठी एमआयएम आमदार मदत करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित सर्व आमदारांना अटक करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याचा तपास एनआयएकडे द्यावा, असेही त्यांनी सांगितले आहे.
‘वंदे मातरम्’चा विरोध, काश्मीरातून कलम ३७० हटवण्याला विरोध, नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध, एनआरसी कायद्याला विरोध, अशी कायम सरकार विरोधी भूमीका घेणाऱ्या ओवैसी यांनी आपला मतदार संघ बळकट करण्यासाठी बांग्लादेशींना भारताचे नागरिकत्व देण्याची मोहीम घेतली आहे का, असा प्रश्न आ. अतुल भातखळकर यांनी केला आहे.