उद्धव ठाकरेंवर नारायण राणे बरसले
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेले भाषण म्हणजे केवळ निर्बुद्ध बडबड होती. मोदी सरकारने काय केलं हे विचारणाऱ्यांनी कलम ३७० प्रमाणे बेळगावचा प्रश्न मार्गी लावावा, असा टोला भाजप खासदार नारायण राणे यांनी, अशी खोचक टीका भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण केले. त्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता, असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.
“शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली का?, कुठल्या योजना मार्गी लागल्या का?, कोरोनाचे संकट कमी झाले का?, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले नाही. मुख्यमंत्र्यांना काय बोलावे, कसे बोलावे हे अजून कळत नाही. मुख्यमंत्री पदासाठी हा माणूस लायक नाही, कोरोनामुळे राज्यात ४३ हजारांपेक्षा जास्त बळी गेले. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण,” असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.
“महाराष्ट्रातील जनतेशी बेईमानी करुन हा माणूस मुख्यमंत्री झाला. केवळ ५६ आमदारांच्या बळावर मुख्यमंत्री झालात कारण सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केलीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेऊन निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लिन चीट दिली. मात्र, सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे. या प्रकरणी आदित्य एकवेळ तुरुंगात जाईल. मला आणि माझ्या मुलांना बेडुक म्हणतो हा माणूस? हा माणूस आणि गांडूळ आहे.” अशा शेलक्या भाषेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
“मी तब्बल ३९ वर्षे शिवसेनेत होतो, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली. केसेस आम्ही अंगावर घेतल्या, स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी दिली आहे का?”, असा प्रश्न त्यांनी विचारला. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेले दसऱ्या मेळाव्यातील भाषण हे शिवराळ होते. एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभते का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. वाघाची भाषा करणारा हा शेळपट माणूस आहे. कुणाला बेडूक म्हणताय? आम्ही वाघ होतो म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केले. बाळासाहेब असते तर तुम्हाला कधीच मुख्यमंत्री केले नसते, असे म्हणत भाजपवर टीका कराल तर याद राखा, जे गेल्या ४० वर्षांत पाहिलं ऐकलं ते बाहेर काढीन तर पळता भुई थोडी होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.