भुवनेश्वर : भाजपतर्फे बिहार विधानसभा निवडणूक पत्रात कोरोना लस मोफत देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनी रान उठवले होते. मात्र, केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी देशभरातील प्रत्येकाला कोरोना लस मोफत मिळणार असल्याची माहिती दिली. निर्मला सितारामण यांच्या वक्तव्यावरून भाजप इतर राज्यांशी भेदभाव करत आहे का, असा आरोप त्यावरुन केला जात होता. मात्र, यावर आता पडदा टाकण्यात आला आहे.
ओदीशाच्या बालासोर येथे ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यानिमित्त एक बैठक घेण्यासाठी सारंगी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती यापू्र्वीच दिली आहे. लस देण्यासाठी प्रतिव्यक्तीला पाचशे रुपयांपर्यंत खर्च येणार आहे.
"बिहारला कोरोनाची लस मोफत मिळणार तर ओदीशामध्ये काय होणार, असा प्रश्न ओदीशा सरकारचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आरपी स्वॅन यांनी विचारला होता. ओदीशातील केंद्राचे मंत्री प्रताप सारंगी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे याबद्दल स्पष्टीकरण मागितले होते. या राज्य सरकारांनी केली मोफत लसीकरणाची घोषणा तमिळनाडू, मध्यप्रदेश, आसाम, पुद्दुचेरी या ठिकाणच्या राज्य सरकारांनी मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशासाठी मोफत लस देण्याची मागणी केली आहे.