नवी दिल्ली : जम्मू काश्मीर प्रशासनाने ब्रॉडबँड इंटरनेट सेवा काही ठराविक ठिकाणी सुरळीत केली आहे. हॉटेल, महाविद्यालये, पर्यटनविषयक आस्थापने आणि अत्यावश्यक ठिकाणी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच ५ जिल्ह्यातील पोस्टपेड २ जी इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर येथून कलम ३७० हटवल्यानंतर खबरदारी म्हणून तिथल्या महत्वाच्या सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.
सरकारी इंटरनेट सेवा पुरवणारी कंपनी बीएसएनएल आणि खासगी कंपन्यांद्वारे इंटरेनेट सुविधा देण्यात येणार आहे. रुग्णालये, बँक, सरकारी कार्यालये, पर्यटन क्षेत्रासंबधी सेवा आणि अत्यावश्यक सेवांसाठी ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा सुरू करण्यात आली आहे, याबाबतची माहिती केंद्रशासित प्रदेशाच्या गृह मंत्रालयाने दिली. जम्मूमध्ये ब्रॉडबॅण्ड आणि मोबाईल एसएमएस सेवा आधीपासूनच सुरु आहे. जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. जम्मू काश्मीर येथून इंटरनेट सहीत इतर बंदी हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारी रोजी दिले होते.