अहमदनगर : पारनेर तालुक्यातील गुणोरेत पती-पत्नी व दोन मुले अशी चौघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आज सकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पत्नी मनोरुग्ण होती व मुलगा दिव्यांग होता. या दोघांवर उपचार सुरू होते. परंतु पती-पत्नी यांनी आपल्या दोन मुलासह आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला.
बाबाजी विठ्ठल बडे, कविता बाबाजी बडे, मुलगा आदित्य व धनंजय (सर्व रा. गुणोरे, ता. पारनेर) ही मयतांची नावे आहेत. यातील पत्नी व एक मुलगा दिव्यांग असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली. बडे कुटुंबीयांच्या मृत्यू मागे नेमके काय कारण आहे, हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही. पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पारनेर पोलीस ठाण्यात आकास्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे.