राजस्थान : काँग्रेस शासित राजस्थान मध्ये बुधवारी शाखा भरवण्यासाठी जमलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर पूर्वनियोजित पद्धतीने हल्ला करण्यात आला. बुंदी जिल्ह्यातील नवलनगर पार्क येथे कार्यक्रमासाठी संघाचे स्वयंसेवक एकत्रित आले होते. काही समाजकंटकांच्या जमावाने तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. जमावाकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात रा. स्व. संघाच्या काही तरुण आणि बाल कार्यकर्त्यांना दुखापत झाली आहे.
घटनेनंतर संघाच्या स्वयंसेवकांनी पोलीस ठाणे गाठून रीतसर तक्रार दाखल केली आहे. जवळपास पन्नास जणांच्या जमावाने केलेल्या या हल्ल्यात पोलीस प्रशासनाने केवळ पाच जणांच्या विरोधात एफ. आय. आर. नोंदवला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या राजवटीत राजस्थानचे केरळ होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पोलीस अधीक्षक ममता गुप्ता यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हल्ल्याच्या प्रकरणात सद्दाम, शफी मोहम्मद, शाहिद या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचे पडसाद राजस्थान विधानसभेत ही उमटले. आमदार मदन दिलवार यांनी संबंधित प्रकरण विधानसभेत लावून धरले. राजस्थान भाजपच्या आमदारांनी काँग्रेस सरकारला विधिमंडळात धारेवर धरल्यानंतर आरोपींवर कारवाई करण्यात आल्याचे समजते. तथापि काँग्रेसच्या राज्यात आता संघ स्वयंसेवकांची मुस्कटदाबी केली जात असल्याचे बोलले जात आहे तर एवढ्या मोठ्या जमावाने हा हल्ला केला, ही मॉब लिंचिंग नाही का? अशी प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटताना दिसत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat