खानिवडे : बोईसर-चिल्हार रस्त्यावर एसटी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात बस चालकासह चार जण जखमी झाले. यावेळी झालेल्या वाहतूक कोंडीत दोन्ही बाजूंनी तीन ते चार किमी च्या रांगा लागल्या होत्या. या घटनेत बसचालक उध्दव कंठाले, प्रवासी ज्ञानदेव आबाळे (४५), सुंगताबाई बालशिराम फापाळे (६५), शैला ज्ञानदेव आबाळे (४०), कल्पेश विजय पाटील (२४), अशी जखमी झालेल्यांची नावे असून त्यांना उपचारासाठी नागझरी येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
बुधवारी सकाळी ८.१५ वाजता बोईसरहून अहमदनगरकडे जाणाऱ्या एसटी बसला वाघोबा खिंडनजीक सेंट फ्रान्सिस स्कूलसमोर एका ट्रकने धडक दिली, यावेळी बस चालकाने प्रवाशांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस रस्ता खड्ड्यात कोसळली. दरम्यान, या घटनेत चालकासह चालकासह अनय प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
दुर्घटनेवेळी पाऊस पडत असल्याने खिंड उतरताना चालकाचा ताबा सुटल्याने दोन्ही वाहनांची धडक झाली. गेल्या तीन दिवसांत येथील खिंडींत तीन वाहनांचे लहानमोठे अपघात झाले आहेत. हा अत्यंत वर्दळीचा असल्याने वाहतूक नियमन आणि रस्ता सुरक्षेबाबत नियम पाळले जात नाहीत का, असा सवाल स्थानिकांनी विचारला आहे. महाराष्ट्रात असणाऱ्या औद्योगिक पट्ट्यांपैकी मोठी व अणू ऊर्जा केंद्र असलेल्या या रस्त्याच्या ठिकाणी सर्वांचेच दुर्लक्ष असून, वाहनचालकांना व प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. (छायाचित्र - विश्वनाथ कडू)
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat