लोकप्रतिनिधीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला प्रेरणा देणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा, संतुलित, समन्वयवादी आपला माणूस पंतप्रधानपदी विराजमान करणारा हा प्रसंग! भारताला विश्वगुरु, वैभवशाली देश म्हणून उभा करण्यासाठी सतत प्राणपणाने काम करण्याची स्फूर्ती देणारा उत्कट असा हा घटनाक्रम! प्रत्येक भारतीयाच्या मनात असे एक ना अनेक भावतरंग क्षणोक्षणी उमटवणारा, आनंदवनभुवनाची अनुभूती देणारा हा दिन!
बाराशे वर्षांच्या परकीय मुस्लीम आक्रमकांच्या अन्यायी-अत्याचारी-धर्मांध सल्तनतीला, धूर्त आणि लबाड ब्रिटिशांच्या गुलामगिरीला भिरकावून देत भारताने १९४७ साली स्वातंत्र्य मिळवले आणि देशाची सत्ता स्वकीयांच्या हाती आली. फाळणीची भळभळती जखम घेऊन का होईना मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद इथल्या तमाम जनतेने देशभरात मोठ्या हर्षोल्हासाने, उत्साहाने साजरा केला. हीच स्वराज्याची भावना २०१४ साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करतेवेळी होती आणि आजही मोदींनी दुसर्यांदा शपथ घेतेवेळी होती व आहे! वनवास संपवून अयोध्येत श्रीरामाचे आगमन झाले तेव्हा, उत्तरेतील धर्मांध आक्रमकांना रोखून विजयनगरचे बिलोरी साम्राज्य उभे ठाकले त्यासमयी, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेच्या जुलमी आणि क्रूर जोखडाला झुगारून देत राज्याभिषेक करवून घेतला, त्यावेळी जी भावना सर्वसामान्यांच्या मनात दाटलेली होती, तसाच उत्सव आजही प्रत्येक राष्ट्रवादी भारतीयाच्या, हिंदुत्वनिष्ठाच्या मनात नांदत होता व इथून पुढेही नांदत राहील. कारण, येथील प्रत्येक व्यक्तीला, स्त्री-पुरुषाला, शेतकरी-कष्टकर्याला, नोकरदार-व्यावसायिकाला, भारतभूच्या कणाकणाला, मनामनाला दुसर्या मोदीपर्वाची सुरुवात हे स्वतःने स्वतःच्या कल्याणासाठी साकारलेले स्वराज्य आणि सुराज्य वाटते.
मोदींच्या दुसर्या कार्यकाळाचा प्रारंभ हा जसा आनंददायक, सुखदायक क्षण, तसेच ते रा. स्व. संघ, जनसंघ आणि भाजपतील ज्येष्ठ, वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि पूर्वसुरींनी आजीवन उपसलेल्या अपार कष्टाचे, मेहनतीचे, तपस्येचेही दृश्य फळ! राजकारण हे सत्ता, शक्ती आणि संपत्ती कमावण्याचे साधन न समजता संसदीय राजकारणाला अत्यंत श्रेष्ठ कर्म, समाजातल्या अंतिम व्यक्तीच्या कल्याणाचा राजमार्ग मानणार्यांच्या परिश्रमाला मिळालेली ही पोचपावतीच! राष्ट्रवादाच्या, हिंदुत्वाच्या मुद्द्याला ज्या ज्या लोकांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात दाबण्याचा, दडपण्याचा, संपवण्याचा, मिटवण्याचा प्रयत्न केला, डाव आखले, खेळ मांडला त्या त्या सर्वच भल्याबुर्या शक्तींना नमवून, झुकवून हा विचार पुन्हा तरारून वर आल्याचाच हा दाखला! वर्षानुवर्षे जाती-पातीच्या, विशिष्टधर्मी लांगूलचालनाच्या राजकारणाधारे देशाची सर्वचप्रकारे लूट करणार्यांना राष्ट्रवादाच्या हुंकाराने, हिंदुत्वाच्या शंखनादाने लगावलेला हा टोलाच! ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’चे धोरण अंगीकारून विकासाच्या, प्रगतीच्या मार्गावर चालणार्या, भारताच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्त्वाला अक्षुण्ण राखण्यासाठी सदैव सजग राहणार्यांना अविस्मरणीय ठरेल असा हा सोन्याचा दिवस! लोकप्रतिनिधीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेला प्रेरणा देणारा, आत्मविश्वास निर्माण करणारा, संतुलित, समन्वयवादी आपला माणूस पंतप्रधानपदी विराजमान करणारा हा प्रसंग! भारताला विश्वगुरु, वैभवशाली देश म्हणून उभा करण्यासाठी सतत प्राणपणाने काम करण्याची स्फूर्ती देणारा उत्कट असा हा घटनाक्रम! प्रत्येक भारतीयाच्या मनात असे एक ना अनेक भावतरंग क्षणोक्षणी उमटवणारा, आनंदवनभुवनाची अनुभूती देणारा हा दिन!
नरेंद्र मोदींच्या आजच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडताना वरील भावना प्रत्येकाला अनुभवास आल्या असतीलच, पण त्याचवेळी दुसर्या बाजूला मोदींची गेल्या पाच वर्षांतली सत्ता आणि आगामी पाच वर्षांचा कार्यकाळ याचाही विचार केला पाहिजे. समोर कोणताही अडथळा नसताना सोप्या-सुलभ निर्णयांऐवजी आपले सरकार कठोरातील कठोर निर्णयही घेऊ शकते, हे मोदींनी पहिल्या कार्यकाळात मोठ्या आत्मविश्वासाने दाखवून दिले. नोटाबंदी, जीएसटी, ओआरओपी, एनआरसी, तिहेरी तलाक विरोधी विधेयक या मोदीनिर्णयांनी भारतीय राजकारण हादरवून सोडले. मोदींच्या या प्रत्येक निर्णयाला विरोध झालाच, पण तो मोदींना सशक्त भारताच्या निर्मितीची पायाभरणी करण्यापासून रोखू शकेल, इतका तीव्र नव्हता. गरिबांच्या, वंचितांच्या आयुष्यात परिवर्तन घडवायचे असेल, तर ते धडाडीने पावले उचलली तरच शक्य होईल, याची जाणीव मोदींना होती. साहजिकच आताही मोदींना दुसर्यांदा प्रचंड बहुमत मिळाले, पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर आले, त्यामुळे ज्या आशा-आकांक्षा-अपेक्षा पाच वर्षांपूर्वी होत्या, तशाच किंवा त्यापेक्षाही अधिक सर्वांच्याच मनात असतील. मोदींनाही ही गोष्ट चांगलीच माहिती आहे, त्यामुळे तेदेखील आपल्या दुसर्या कार्यकाळात सर्व समस्यांचा सामना करत बलशाली भारताच्या कल्पनेला मूर्तस्वरूप देण्यात कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही, याची खात्री वाटते.
गेल्या पाच वर्षांत परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून मोदी सरकारने आपली छाप पाडली. जगाच्या पटलावर भारताचे नाणे खणखणीतपणे वाजले. राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातही सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करत मोदींनी आम्ही आमच्या भूमीच्या रक्षणासाठी आवश्यक ते सर्व करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. सोबतच आज सकाळीच आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेशी कदापि तडजोड करणार नाही, याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. ‘बिमस्टेक’ देशांच्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधीला निमंत्रण देऊन आपल्या पराष्ट्रधोरणाची दिशा कोणती असेल, हेही मोदींनी दाखवून दिले. हे सगळे घडत असतानाच मोदींना येत्या पाच वर्षांत काय करावे लागेल किंवा त्यांनी कोणते निर्णय घ्यावे, हेही लोकांच्या मनात आहे. भारताची लोकसंख्या आज १३५ कोटींच्या पुढे गेली असून आगामी २०२१च्या जनगणनेवेळी ती १४० कोटींपर्यंतही पोहोचू शकते, म्हणूनच लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मोठी गरज आहे. भारतीय जनता पक्ष सातत्याने देशातील सदोष शिक्षण पद्धतीविरोधात आवाज उठवत आला. प्रदीर्घ काळापासून जर्जर झालेल्या शिक्षणपद्धतीला संजीवनी देण्याचे, भारतीयांचा मानभंग करणारा इतिहास बदलून सत्य ते समोर आणण्याचे आणि नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याचेही आव्हान नव्या सरकारसमोर असेल. निवडणूक काळात ज्या दोन-तीन मुद्द्यांवर विरोधकांसह बुद्धिजीवी, धर्मनिरपेक्षतावादी, उदारमतवादी आदींनी वावटळ उठवली, त्यांवरही उत्तर शोधावे लागेल. जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले ‘कलम ३५ अ,’ ‘कलम ३७०,’ राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक हे ते मुद्दे, विरोधाला न जुमानता देशहितासाठी यासंबंधाने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागेल. याव्यतिरिक्त रोजगार, शेती-शेतकरी, पाणी, स्वच्छता आदी विषयांवरही ठोस कार्यवाही करणे आवश्यक होईल. अर्थात, कोट्यवधी सर्वसामान्यांच्या पाठिंब्याने, समर्थनाने, आशीर्वादाने सत्तेवर आलेला ‘भारतमातेचा लाल’ देशाला परम वैभवाला घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली ही पावले नक्कीच उचलेल, यात कोणतीही शंका नाही आणि मोदींच्या याच कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवाराकडून हजारो, लाखो, कोट्यवधी शुभेच्छा!
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat