नवी दिल्ली : एकीकडे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १६ जवान हुतात्मा झाले, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या दहशवाद्यांच्या कुरापती पुन्हा सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासून दक्षिण काश्मीरच्या शोपियाँमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु आहे. इमाम साहिब भागातील अडखारा येथे ही चकमक सुरु आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले.
यापूर्वी, २५ एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा येथे हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला होता. याच दहशतवाद्यांनी मार्च महिन्यात महिला पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. याआधी २० एप्रिल रोजी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली होती. सोपोरमधील वाटरगाम येथे झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला मारले होते. शोपियाँमध्ये १३ एप्रिल रोजी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्याआधी ६ एप्रिल रोजी इमाम साहिब भागात सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat