गडचिरोली : एकीकडे महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना दुसरीकडे गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ वीरमरण आले. सीआरपीएफच्या शिघ्र कृती दलामधील जवान खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या बरोबरच जवानांच्या घेऊन जाणाऱ्या गाडीच्या चालकाचाही या भीषण हल्ल्यात मृत्यू झाला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ हा भूसुरुंग स्फोट झाला. नक्षलींना चकवण्यासाठी १५ जवान आणि चौघे जण दोन खासगी गाड्यांनी जात होते. मात्र, नक्षलींना माहिती मिळाल्यामुळेच त्यांनी हा हल्ला घडवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गडचिरोलीत मंगळवारी मध्यरात्रीच सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्याचे काम सुरु असलेल्या भागातील तब्बल ५० वाहनांची जाळपोळ केली होती. संपूर्ण गावभर शासनाविरोधी मजकूर लिहिलेले बॅनर लावून १५० नक्षलींनी ५० वाहने आणि अन्य यंत्रसामग्री पेटवली होती.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat