मध्यप्रदेश : नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या विरोधी पक्षांवर मंगळवारी तोफ डागली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी वायुदलाने हवाई हल्ला करून ‘जैश ए मोहम्मद’चे तळ उध्वस्त केले. देशवासीयांनी भारतीय वायुदलाच्या या कामगिरीचे कौतूक केले. मात्र, विरोधक या कारावईचे पुरावे मागत आहेत. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानात उध्वस्त केले मात्र, धक्का भारतातल्या काहीजणांना बसला, असा टोला त्यांनी विरोधी पक्षांना लगावला.
एअर स्ट्राईक अर्थात हवाई हल्ला पाकिस्तानात बालाकोटमध्ये झाला मात्र, त्याचा धक्का मात्र भारतातल्या काहीजणांना बसला, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर तोफ डागली. दहशतवादी हल्ला झाला की भारत तोडीस तोड उत्तर देतो. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करतो. मात्र, त्याचेही राजकारण भारतातले काही लोक करतात. हे आपले दुर्दैव, असे पंतप्रधान म्हणाले.
मध्यप्रदेशात झालेल्या भाजपाच्या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. संयुक्त पुरोगामी आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा त्यांनी शत्रू राष्ट्राला कधीही चोख प्रत्युत्तर दिले नाही. आता मात्र आपल्या शूर जवानांच्या कामगिरीवर या विरोधकांनी संशय घेत आहेत. यावरून त्यांची मानसिकता काय हे लक्षात येते असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. २६/११ च्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला क्लिन चिट कुणी दिली?, असाही प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat