सर्जिकलची ‘उत्तरक्रिया’

    26-Feb-2019
Total Views | 257

 

 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकस्थित दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यास खुली सूट दिलेल्या भारतीय वायुसेनेने लोकभावनेचा आदर करत थेट पाकने बळकावलेल्या भूमीतच रक्ताची होळी खेळली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वर्णन केलेल्या भारतमातेचे ‘अधम रक्तरंजिते’चे रूप यावेळी प्रत्येक भारतीयाला आणि पाकिस्तानलाही अनुभवायला मिळाले.
 

भारतीय वायुसेनेच्या जाँबाज जवानांनी भल्या पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी पिलावळ झोपेत असतानाच धडाकेबाज ‘एअर स्ट्राईक’ करत पुलवामा हल्ल्यातील सैनिकांच्या हौतात्म्याचा बदला घेतला. नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानच्या ताब्यातील बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चाकोटी इथल्या जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या अड्ड्यांवर हल्ला करण्याचे धाडस दाखवत वायुसेनेने ३५० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना जन्नत की जहन्नुममध्ये पोहोचवले. ‘मिराज-२०००’ विमानांनी गडगडाट करत डागलेल्या बॉम्बगोळ्यांमुळे केवळ दहशतवादीच नव्हे, तर जीवाच्या आकांताने पाकच्या नापाक भूमीत लपून बसलेल्या मौलाना मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहर आणि भाऊ इब्राहिम अझहरही अल्लाला प्यारा झाला. पाकिस्तानच्या रडार यंत्रणा, विमानभेदी प्रणालीला चकवा देत भारतीय वायुसेनेने मिळवलेले हे यश खरोखरच कौतुकाची, अभिमानाची नि गौरवाची गोष्ट. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश पाकिस्तानविरोधात सूडाच्या भावनेने पेटून उठला होता. अवघा भारत ‘बदला घ्या,’ ‘बदला घ्या’ची रोखठोक मागणी करत होता. पराक्रमाच्या भुकेल्या जनतेने पाकिस्तानी जिहाद्यांच्या नरमुंडांची माला भारतमातेला अर्पण करण्याची कांक्षा देश केंद्रीय नेतृत्वासमोर व्यक्त करत होता.

 

परिणामी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकस्थित दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यास खुली सूट दिलेल्या भारतीय वायुसेनेने लोकभावनेचा आदर करत थेट पाकने बळकावलेल्या भूमीतच रक्ताची होळी खेळली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वर्णन केलेल्या भारतमातेचे ‘अधम रक्तरंजिते’चे रूप यावेळी प्रत्येक भारतीयाला आणि पाकिस्तानलाही अनुभवायला मिळाले. विशेष म्हणजे, सावरकरांच्या आत्मार्पणदिनीच ही राष्ट्रवादाचा, देशभक्तीचा वडवानल चेतवणारी घटना घडली व भारत सैनिकीदृष्ट्या, संरक्षणदृष्ट्या बलवान व्हावा, असे ध्येय उराशी बाळगणार्‍या स्वातंत्र्यवीरांना जणू काही प्रतिकात्मकरित्या तेजस्वी आदरांजलीच वाहिली गेली! भारतीय वायुसेनेच्या दहशतवाद्यांविरोधातील या तडाखेबंद कारवाईनंतर सोशल मीडियावर तर वायुसेनेच्या अभिनंदनपर प्रतिक्रियांचा पाऊसच पडल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नव्हे, तर १४ फेब्रुवारीच्या पुलवामातील भीषण घटनेनंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तेरावे घातल्याचेही आनंदाभिमानाने म्हटले गेले. भारतीय जनमानसात पाकिस्तानला नष्टभ्रष्ट करण्याची किती तीव्र मनिषा असेल, हेच यातून अधोरेखित होते.

 

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारतीय सैन्यदलांच्या हालचालींमुळे दहशतवाद्यांविरोधात नक्कीच ठोस कारवाई केली जाईल, असे सातत्याने वाटत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील आपल्या प्रत्येक संबोधनातून सैनिकांच्या हौतात्म्याचा प्रतिशोध घेणारच, असे ठामपणे सांगत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही भारत पाकिस्तानविरोधात मोठे काहीतरी करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट करत जणू काही पुढच्या आक्रमक पावलाचे सुतोवाच करत होते. अन् तो प्रत्यक्ष कारवाईचा दिवस उजाडायच्या आधीच पहाटे पहाटे भारतीय विमाने पाकिस्तानात घुसली आणि केवळ २१ मिनिटांत काम फत्ते करून माघारीही परतली. शत्रूला गाफील ठेऊन गनिमी काव्याने आपले ईप्सित साध्य करण्याची नीती छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेवेळी वापरली होती. भारतानेही आजच्या दहशतवाद्यांविरोधातील हल्ल्यावेळी हेच धोरण अवलंबत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या बगलबच्च्यांना ते घोरत पडलेले असतानाच गाठले. अशावेळी ‘मिराज-२०००’ विमानांच्या भडिमारापुढे पाकने पोसलेल्या दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यापासून त्यांना कोण बरे वाचवू शकत होते? तर नाहीच, कोणीही नाही, अन् तसेच झाले. ३५० हून अधिक दहशतवादी मारले गेले, गाडले गेले, मिटवले गेले.

 

भारतीय प्रसारमाध्यमांत वायुसेनेच्या ‘एअर स्ट्राईक’चे वृत्त आल्यानंतर मात्र पाकिस्तानच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रचंड क्षोभ उसळल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी, संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने, पंतप्रधान इमरान खान यांनीही भारताविरोधात गरळ ओकली, अन् त्याचवेळी भारताने असा काही ‘एअर स्ट्राईक’ केल्याचेही नाकारले. आता इथे एक प्रश्न उभा राहतो. जर भारताने दहशतवादी तळ बेचिराख करण्याचे कृत्य केलेच नसेल, तर पाकिस्तानचे कर्तेधर्ते भारताच्या नावाने का छाती पिटत आहेत? पाकिस्तानी संसदेत पंतप्रधान इमरान खानविरोधात ‘शेम’, ‘शेम’चे नारे का लावले जात आहेत? संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची मागणी का केली जात आहे? भारताला धडा शिकवण्याची चवताळी भाषा का वापरली जात आहे? म्हणजेच, भारतीय वायुसेनेच्या खदिरांगाराने पाकची जळाली तर आहेच, पण लोकलज्जेस्तव वा अन्य कोणत्यातरी कारणास्तव पाकिस्तानला ते दाखवता येत नसावे. म्हणूनच भुसभुशीत मुद्द्यांच्या आधारे तो देश अशी काही कारवाई झालीच नसल्याचे म्हणत आहे. ‘गिरे तो भी टांग उपर’ जे म्हणतात ते यालाच!

 

७१ वर्षांपूर्वी अखंड भारताचा हिस्सा असलेला पाकिस्तान १९४७ मध्ये फुटून निघाला. तेव्हापासून पाकिस्तान देश म्हणून उभे राहण्यासाठी धडपडत असल्याचे नेहमीच दिसले. प्रारंभी लष्करशाही, नंतर लोकशाही, पुन्हा लष्करशाही, नंतर लोकशाही अशा फेर्‍यात अडकलेल्या पाकिस्तानची आजची अवस्था तर तिथे नेमके राज्य आयएसआयचे आहे की लष्कराचे की दहशतवाद्यांचे की लोकनियुक्त शासनाचे? याचे उत्तर न मिळण्यापर्यंत झाली. अशी ही बिकट अवस्था म्हणजे त्या देशाची शोकांतिकाच म्हटली पाहिजे! सोबतच इस्लामला कवटाळून ‘चैन-ओ-अमन’ची आशा करणार्‍या पाकिस्तानची ही स्थिती तिथल्या मूलतत्त्ववाद्यांमुळेच झाल्याचे कोणीही मान्य करेल. अर्थात जोपर्यंत पाकिस्तान स्वतः यापासून मुक्त होण्याची इच्छाशक्ती दाखवत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती कायमच राहील. दरम्यान, २०१६ साली भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांची शिबिरे उद्ध्वस्त करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता, तेव्हा या प्रहाराने पाकिस्तान शहाणा होईल व काही आगळीक करणार नाही, असेही वाटत होते. पण, म्हणतात ना कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच! वस्तुतः सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या कामगिरीवर आधारित ‘उरी’ हा चित्रपट सर्वत्र नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील एका पात्राच्या तोंडून “यह नया भारत है, यह घर में घुसेगा भी और मारेगा भी” असे एक वाक्य आहे. खरे म्हणजे चित्रपट हे भवताली घडत असलेल्या वस्तुस्थितीचे प्रतिबिंब असते, जे मनात-समाजात दिसते, तेच त्यातूनही व्यक्त होते. मात्र, पाकिस्तान इतका मूर्ख की, त्या देशाला हा सुस्पष्ट शब्दांतला संदेशही समजला नाही किंवा त्या देशापर्यंत तो पोहोचू शकला नाही. अन् हे न कळलेल्या त्या देशाने दहशतवादी हल्ला करण्याचा उद्दामपणा केला. अर्थात, या दुर्लक्षाचे नेमके काय परिणाम होतात, हेही आज पाकिस्तानला दिसलेच!

 

देशात सर्वत्र पाकिस्तानला धोबीपछाड देणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या कारवाईचा आनंद साजरा केला जात असतानाच यामुळे मोदींची पंतप्रधानपदाची खुर्ची पक्की झाली, असा एक क्षुल्लक कांगावा काही बोलघेवड्यांकडून होताना दिसतो. मात्र, ज्यावेळी अशा लोकांच्या हाती सत्ता होती, त्यावेळी कधीही देशाला करारी नेतृत्व लाभले नाही. उलट कणखर नेतृत्व म्हणजे काय, हेही ते विसरून गेल्याचे लक्षात येते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात देशात अनेकदा बॉम्बस्फोट झाले, पण तत्कालीन नेतृत्वाने कधी पाकिस्तानला दिवसा तारे दाखविण्याचा पोलादी बाणा स्वीकारला नाही. आता मोदी तेच करत आहेत, तर त्याविरोधात फुकाच्या गोष्टींची चिवडाचिवड करताना ही मंडळी दिसतात. अशा व्यक्तींना कोणत्या गोष्टीवर कोणती भूमिका घ्यावी, याची समज नसल्याचेच यातून दिसते. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा दिनक्रम पाहिला की, या माणसाच्या मनात नेमके काय सुरू असेल, याचा थांगपत्ताही कोणाला लागू शकत नाही, असेच वाटते. कारण, आज दिवसभरात मोदींनी राजस्थानच्या चुरू येथे रॅली केली. नंतर मोदींनी गांधी शांतता पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली व अहिंसेबाबत मत व्यक्त केले. पुढे दिल्लीच्या इस्कॉन मंदिरात पंतप्रधानांच्या हस्ते जगातल्या सर्वाधिक वजनाच्या व लांबीच्या भगवद्गीतेचे अनावरण करण्यात आले, पण या कोणत्याही प्रसंगी मोदींनी वायुसेनेच्या ‘एअर स्ट्राईक’चा वापर केला नाही. उलट देशाच्या सीमेपलीकडे भारतीय विमानांनी पाकिस्तानला लोळवलेले असतानाही नरेंद्र मोदी इस्कॉन मंदिरात सर्वसामान्यांप्रमाणे मेट्रोने गेले. देशात एखादा हल्ला झाला की, सर्वत्र ‘हाय अलर्ट’, ‘हाय अलर्ट’चा इशारा दिला जातो. तसा तो आताही देण्यात आला होताच. मोदींनी मात्र हे ‘हाय अलर्ट’चे दडपण, दबाव झुगारुन कितीही काही झाले तरी इथे देशाचा पंतप्रधानही निडरपणे रेल्वेने प्रवास करु शकतो, हे दाखवून दिले. हा मोदींच्या रेल्वेप्रवासातला संदेश आहे आणि हेच मोदींच्या देशांतर्गत विरोधकांनी व पाकिस्ताननेही समजून घ्यावे. अर्थात, त्यांनी ते जरी समजून घेतले नाही, तरी आज पहाटेच्या रामप्रहरी जसा धडाड्धुडूमचा आवाज गुंजला, तसाच तो नेहमी येत राहील आणि पाकिस्तानची सर्जिकल ‘उत्तरक्रिया’ही सुरूच राहील, हे नक्की!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
अग्रलेख
जरुर वाचा
इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

(Iran Strikes 150 Missiles on Israel) इस्रायलने शुक्रवारी दि. १३ जून रोजी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने या हल्ल्यात इस्रायलमधील अनेक शहरांवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने तेल अवीव व जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणी लष्कराने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त इस्रायलमधील एका वृत्तप..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121