गर्भावस्थेचे ९ महिने (४२ आठवडे) पूर्ण झाल्यानंतरही लांबलेली गर्भावस्था किंवा प्रसुतीच्या अंदाजित तारखेला १४ दिवस उलटून जाणे अशी ‘पोस्ट-टर्म प्रेग्नन्सी’ची व्याख्या केली जाते. सर्वसाधारणपणे होणार्या मातेने गर्भावस्थेचे ३७ आठवडे पूर्ण केल्यास आम्ही त्याला ‘टर्म प्रेग्नन्सी’ किंवा ‘पूर्ण दिवसांची गर्भावस्था’ असे म्हणतो. तेव्हा, यामागची कारणे, उद्भवणार्या समस्या आणि या समस्येचे निदान याविषयी आजच्या लेखातून सविस्तर जाणून घेऊया...
कारणे
लांबलेल्या गर्भावस्थेचे सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे कारण म्हणजे प्रसुतीच्या तारखेचा अंदाज बांधण्यात झालेली चूक. त्यामुळे एखाद्या महिलेची गर्भावस्था ’पोस्टडेट्स’च्या टप्प्यावर पोहोचल्याचे म्हणजे ४० आठवड्यांच्या पुढे गेल्याचा संशय आल्यास पहिल्यांदा तिची शेवटची पाळी नेमकी कोणत्या तारखेला आली होती हे तपासायला हवे. गर्भावस्था लांबण्याचे कारण हे बरेचदा अज्ञात असते. अशा अवस्थेशी निगडित धोक्यांची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात - पहिलीच गर्भधारणा असल्यास, यापूर्वी गर्भावस्था लांबलेली असल्यास, पोटात पुरुषभ्रूण वाढत असल्यास, होणार्या मातेस लठ्ठपणाची समस्या असल्यास. याखेरीज हार्मोन्समुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळेही असे घडू शकते.
गुंतागुंती आणि धोके
सुमारे २० टक्के ‘पोस्ट-टर्म’ अर्भकांमध्ये ‘डिसमॅच्युरिटी सिंड्रोम’ दिसून येतो. याचा अर्थ ही बाळे शरीराने ‘इन्ट्रायुटरीन ग्रोथ रिटार्डेशन’ (IUGR) म्हणजे गर्भाशयाच्या आत वाढीची गती मंद झालेल्या बाळांसारखी (नाळेवाटे पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे गर्भाशयाच्या आत असताना अकाली वाढ खुंटलेल्या बाळांप्रमाणे) दिसतात. यात सुरकुतलेली, पापुद्रे निघणारी त्वचा (अतिरिक्त डेसक्वामेशन), कृश अंगकाठी (कुपोषण), लांब केस आणि नखे, ऑलिगोहायड्रॅमनिओस (अॅम्निऑटिक द्रावाची कमतरता) आणि मॅकॉनियम बाहेर पडणे (बाळांची विष्ठा) अशा गोष्टींचा समावेश होतो. अशा प्रकारच्या गर्भावस्थेमध्ये ऑलिगॉहायड्रॅमनिओसमुळे नाळ दाबली जाण्याचा धोका अधिक मोठा असतो, तसेच ‘निओनॅटल डिप्रेशन’, ‘हायपोग्लायसेमिया’ (रक्तातील शर्करेची पातळी खालावणे), सीझर्स किंवा आकडी येणे आणि श्वसनक्रिया संपूर्ण क्षमतेने न चालणे अशा नवजात बालकांमध्ये लगेचच दिसून येणार्या गुंतागुंतीही दिसून येतात. बाळाच्या मेंदूला दीर्घकाळासाठी दुखापत होण्याचा धोकाही वाढू शकतो.
समस्येचे व्यवस्थापन
अशा स्थितीमध्ये पाळावयाचा एक महत्त्वपूर्ण नियम म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करणे. ते नेहमीच अर्भक आणि माता या दोहोंच्याही सर्वाधिक हिताचा निर्णय घेण्याचाच प्रयत्न करतील, याची मनोमन खात्री बाळगणे.